₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct
जैविक शेती ही येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये खरेच काळाची गरज असणार आहे. आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न वापरता तशी आता आपण करत आहोत का?
मुळात ६०-७० वर्षांपूर्वी बाजारात कोणतेही रासायनिक खत किंवा विषारी कीटकनाशक नव्हतेच. त्या वेळी शेती ही पूर्ण शेणखतावरच केली जायची म्हणून तेव्हा जी धान्य, भाजीपाला, फळे मिळायची ती पौष्टिक असायची. ते अन्न खाल्ल्यानंतर मानवाच्या शरीराला आवश्यक घटक मिळायचे.
शरीराची सर्व पोषक घटकांची गरज पूर्ण व्हायची म्हणून त्या वेळी माणसे १०० ते १२५ वर्षे जगत होती, पण आता माणसांचे आयुष्यमान १०० वरून ६०-७० वर आले आहे. हे दुष्परिणाम कशाचे आहेत, हा आपण विचार केला आहे का?
हे दुष्परिणाम आहेत रसायनांचे. आपण जो शेतात रसायनांचा वापर करतो यामुळे काय काय होते? सर्वात आधी माती खराब होते. मातीतील पोषक घटक कमी होतात. मातीतील जीव-जंतू नष्ट होतात व क्षारपाड, कडक, नापीक होण्याच्या मार्गावर जाते. तीच रसायने पाण्यात मिश्रीत होतात.
त्यामुळे पाणी खराब होते, पाऊस पडल्यानंतर शेतात जी रसायने वापरली आहेत ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन विहीर, ओढे, नाले, नदी, धरण या पाण्यात मिसळते. पशू, पक्ष्यांसह पेयजलावाटे ही रसायने आपल्या शरीरात जातात.
आजच्या आहारातून मानवाच्या शरीरास ज्या घटकांची गरज आहे ते घटक मिळत नाहीत. रसायनयुक्त आहार, पाणी, हवा यामुळे आज मानवाला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. आज आईच्या दुधातसुद्धा विषारी कीटकनाशकाचा अंश आढळत आहे. लहानपणापासून जर हे विष मुलांच्या शरीरात गेले तर कशी निरोगी घडेल पुढची पिढी.
यावर उपाय काय?
शेतकरी मित्रांनो, आपण हळूहळू रसायनांचा वापर कमी करून जैविक, सेंद्रिय शेतीकडे वळायला हवे, कमी खर्चात शेती कशी होईल व उत्पादनात वाढ कशी होईल याचा विचार करायला हवा. आज शेतीचा खर्च खूप होतो; पण त्यामानाने उत्पादन मिळत नाही. जर मिळालेच तर भाव मिळत नाही.
आपण जर जैविक शेती केली तर शेतीचा खर्चपण कमी होईल. मातीपण चांगली राहील, उत्पादनातसुद्धा वाढ होईल व सकस पौष्टिक अन्न आपल्याला खायला मिळेल ते बाजारात चांगल्या दराने विकता येईल. शेतमालाला चव व गुणवत्ता चांगली असल्यामुळे भावसुद्धा चांगला मिळेल.
आज एक वर्ग असा आहे जो जैविक शेतीतून आलेला भाजीपाला, धान्ये, फळे हे घेण्यास तिप्पट पट पैसे मोजतात. कारण त्यांना माहीत आहे, विषयुक्त आहार खाऊन नंतर औषधांना पैसे मोजण्यापेक्षा विषमुक्त आहार घेतल्यास आपलेच पैसे वाचतील. आजार झाल्यानंतर किती खर्च होईल माहीत नाही. येत्या तीन-पाच वर्षांत ही मागणी वाढेल. माणसे जागृत होत आहेत.
ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपण जैविक शेती करून ही मागणी पूर्ण करू शकतो. यासाठी भविष्यात वेगळ्या बाजारपेठा निर्माण होतील जिथे फक्त (विषमुक्त) धान्ये, फळे, भाजीपाला मिळेल. यामुळे आपलीच आर्थिक प्रगती होईल. भारतातील पहिले जैविक शेती करणारे राज्य सिक्कीम. आज या राज्यातील शेतकरी रसायने वापरत नाहीत. ही परिस्थिती महाराष्ट्रातपण नक्की येईल.
– अजित गायकवाड
९५५२३०८६७५