जेआरडी टाटा यांच्याविषयी जाणून घ्याव्यात या १० गोष्टी
बिझनेस लिजेंड्स

जेआरडी टाटा यांच्याविषयी जाणून घ्याव्यात या १० गोष्टी

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


भारतीय अर्थव्यवस्थेत कित्येक उद्योगपतींनी एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे ‘टाटा’. या नावातच एक प्रकारचा आधार जाणवतो.

टाटा समूहाची स्थापना १८६८ मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली. आतापर्यंत ‘टाटा ग्रुप’चे ७ चेअरमन नियुक्त झालेत त्यापैकी जेआरडी टाटा हे एक होते. जेआरडी यांच्या काळात त्यांनी ‘टाटा उद्योग समूहाला’ एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले. जेआरडी टाटा हे ‘टाटा अ‍ॅण्ड सन्स’च्या ५० वर्षे अध्यक्षपदावर होते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

१. २९ जुलै १९०४ या दिवशी पॅरिस येथे जन्म झालेल्या जेआरडी टाटा यांचे संपूर्ण नाव जहांगीर रतनजी दादोभाई टाटा असे होते. भारतीय उद्योग जगतेचे प्रणेते जमशेदजी टाटा यांचे चुलत बंधू रतनजी टाटा आणि रतन टाटा यांचे द्वितीय पुत्र म्हणजे जेआरडी टाटा.

२. मुंबईतील कॅथरड्रयु आणि जॉन कॅनॉन स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. उच्च शिक्षण मात्र त्यांनी लंडन, जपान आणि फ्रान्स येथून घेतले. फ्रान्सच्या सैन्यात जाण्यापूर्वी ते फ्रान्सचे एक वर्षासाठी नागरिक झाले होते.

३. फ्रान्सच्या सैन्यात एक वर्ष पूर्ण केल्यानंतर जेआरडी भारतात परतले. १९२५ साली विनापगारी शिकाऊ कामगार म्हणून ‘टाटा अ‍ॅण्ड सन्स’ कंपनीत रूजू झाले. त्यानंतर पुढच्या बारा वर्षातच म्हणजे १९३८ साली जेआरडी टाटा हे ‘टाटा अ‍ॅण्ड सन्स’ कंनीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. भारताच्या एका मोठ्या औद्योगिक समूहाचे ते प्रमुख झाले.

४. जेआरडी टाटा यांनी आकाशात उडण्याचे स्वप्न होते. १० फेब्रुवारी १९२९ मध्ये ते भारतातील पायलटची परीक्षा पास करणारे पहिले व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पायलट म्हणून लायसन्सही मिळाले. कालांतराने ते नागरी विमान वाहतूकीचे जनक बनले. १९३२ मध्ये त्यांनी टाटा विमान सेवा (टाटा एअरलाइन्स) सुरू केली, जी पुढे भारताची महत्त्वाची विमान सेवा, एअर-इंडिया म्हणून नावारूपाला आली.

५. १९३८ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर आपल्या अध्यक्षतेखाली त्यांनी चौदा नवीन उद्योग सुरू केले. ५० वर्षांनंतर म्हणजे १९८८ मध्ये टाटा अ‍ॅण्ड सन्सने सुरू केलेले आणि ते स्वत: लक्ष देत असलेले असे ५० उद्योग होते.

६. १९३२ मध्ये स्थापन केलेल्या ‘सर दोराबजी टाटा’ या ट्रस्टचे जेआरडी टाटा पुढील ५० वर्षे काम पाहत होते. १९४१ मध्ये जेआरडी टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली आशिया खंडातील पहिलं कॅन्सर रुग्णालय ‘टाटा मेमोरियल सेंटर फॉर कॅन्सर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रीटमेंट, बॉम्बे’ यांच्या स्थापना झाली.

७. १९४८ साली ‘टाटा मोटर्स’ची स्थापना झाली. १९४८ मध्येच एअर इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय एअर लाईन्सची सुरुवात झाली. जेआरडी टाटा एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १९५३ साली भारत सरकारने त्यांच्या नियुक्ती इंडियन एअरलाइन्सच्या संचालक मंडळावर केली. २५ वर्षे त्यांनी या पदावर काम केले. त्यांना भारतीय हवाई उड्डाणातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे एअर कमांडर म्हणून गौरवले गेले.

८. जेआरडी टाटा नेहमीच आपल्या कामगारांचा विचार करत असत. म्हणूनच त्यांनी १९५६ साली ‘एम्प्लॉयी असोसिएशन विथ मॅनेजमेंट’ची स्थापना केली. याद्वारे त्यांनी कामगारांना त्यांचे मत न घाबरता मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कामगारांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या. कामाचे आठ तास, कामगारांसाठी मोफत औषधे, अपघात व्यवस्थापन, प्रोव्हिडंट फंड अशा अनेक प्रकारच्या कामगारांच्या हिताच्या गोष्टी त्यांनी केल्या.

९. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. १९५७ साली एअर-इंडियाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला गेला. १९८८ मध्ये हवाई उड्डाण क्षेत्रातील कामासाठीही पुरस्काराने गौरवले होते. पुढे त्यांच्या नि:स्वार्थ कामासाठी भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे ‘भारतरत्न’ १९९२ मध्ये त्यांना प्रदान केला गेला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतरत्न हा पुरस्कार त्यांच्या हयातीतच दिला गेला. त्याचवर्षी त्यांना ‘युनायटेड नेशन पॉप्युलेशन’ पुरस्कारही दिला गेला.

१०. २९ नोव्हेंबर १९९३ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी स्वित्झलँड येथील जिनेव्हा शहरात त्यांचा मृत्यू झाला. भारतीय संसद त्या दिवशी बरखास्त केली गेली होती. हा सम्मान केवळ लोकसभेचे सभासद असलेल्या व्यक्तींनाच मिळतो.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!