श्री सिद्धगिरी मठात होणारी देशी गाय केंद्रित सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती ही मनुष्य आणि जीवसृष्टीला स्वावलंबी जीवनपद्धतीचा पुरस्कार देते. नेमके हेच गमक ओळखून देशी गोवंशपालन-केंद्रित सेंद्रिय शेती करून संतुलित जीवनपद्धती विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून करवीर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील कणेरी येथील श्री सिद्धगिरी मठात काम चालते.

निरोगी संतुलित जीवन जगण्यासाठी निरोगी हवा, वातावरण महत्त्वाचे आहे यात सर्व समावेशक गोष्टींचा विचार करायला हवा. भूतलावरील प्रत्येक जीव, मानव, पक्षी, जनावरे या सर्वांचे आरोग्य चांगले असायला हवे, कारण हे प्रत्येक जण एकमेकांच्या समृद्धीसाठी काम करीत असतात. त्यात माणूस वगळून सर्व जण आपआपले काम चोखपणे, प्रामाणिकपणे बजावतात, परंतु माणूस संतुलन बिघडवताना दिसतो आहे.

स्वावलंबी जीवनपद्धतीचा स्वीकार सेंद्रिय शेतीत केलेला आहे. तीच सुखी-समाधानी जीवनपद्धती आहे. १९६० च्या दशकात जी हरित क्रांती झाली त्यात अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यात रासायनिक खतांचा तसेच औषधांचा वापर किती करावा हे ज्ञान मात्र शेतकरी वर्गाला मिळालेले नाही आणि याच्याच बेसुमार वापरामुळे आज आपणाला या विरोधाभासाचा सामना करावा लागत आहे.

रासायनिक खते व औषधे यांचे बेसुमार वापर यामुळे पाणी, हवा, मिळणारी उत्पादिते स्वच्छ राहिलेली नाहीत. त्यामुळे अनेक दुर्धर आजारांस सामोरे जावे लागते आहे. यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे हाच एक मार्ग असेल आणि शेतकर्‍याने त्याकडे वळणे गरजेचे आहे.

आज सुधारित अवजारांचा वापर केला जातो आहे. आपले पूर्वज पेरणीसाठी कुरीचा वापर करत होते. तिच्यात तीन फळा असतात. त्यातील एक शेतकर्‍यासाठी, दुसरा पशू-पक्षी जनावरे व तिसरा गावातील बारा बुलतेदार यांच्यासाठी असतो. यातूनच निसर्गाचे संतुलन राखले जाते. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हीच सेंद्रिय शेतीची मूळ संकल्पना आहे. सेंद्रिय शेतीतील उत्पादीत केलेले धान्य कसदार असते. त्यात जास्त प्रथिने असतात.

वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी उच्चांकी धान्य उत्पादनासाठी हरित क्रांतीचा नारा दिला. मुख्यत्वे मोठ्या प्रमाणात उत्पादन याकडे लक्ष देण्यात आले. यात उत्पादन वाढले. उत्पादन खर्च वाढला, परंतु उत्पादित मालाला गुणवत्ता राहिली नाही. रासायनिक खतांचा व औषधांचा वापर यावर दंडकरहिते नाहीत. यातून जमिनी नापीक झालेल्या दिसून येत आहेत.

सेंद्रिय शेतीमध्ये देशी गाईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याबरोबरीने पंचगव्यालाही महत्त्व आहे. गाईच्या उत्पादक सर्व बाबींमुळे आपण कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करू शकतो. गाय आणि केंद्रिय शेती यांचा एक जिव्हाळ्याचा संबंध आहे. देशी गाईंच्या शेणामध्ये अनेक घटक आहेत, ज्यात माणूस, शेती पर्यावरण, भावी पिढीचा विकास या गोष्टींचा अंतर्भाव आहे.

देशी गाय कुटुंबात आली की, त्या घराचा विकास व्हायला सुरुवात होते. गाईपासून आपणाला शेण, त्यापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत, गोबर गॅस, शेतीसाठी शेण-मुत्रापासून स्लरी व कसदार खत मिळते. गोमूत्र हे कीटक नियंत्रणासाठी पिकांवर फवारता येते.

भारतीय आरोग्यशास्त्रामध्ये पंचगव्याला विशेष महत्त्व आहे. देशी गायीच्या शेण, मूत्र, दही, दूध आणि तुपापासून हे पंचगव्य तयार केले जाते. यासाठी शेतकर्‍याने प्राथमिक पातळीमध्ये एक देशी गाय घेऊन सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाकडे वळावे. श्री सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्‍वर म्हणतात :

“देशी गाईचे महत्त्व आमच्या लेखी खूप आहे. ती गोष्ट कृतीमध्ये आणणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही देशी गाय, गोवंश संवर्धनाचा उपक्रम सुरू केला आहे. निरोगी, निरामय जीवनपद्धतीचा पुरस्कार करण्यासाठी मठामार्फत गोशाळा सुरू केली आहे. यात अनेक जातींच्या गाईचे, गोवंशाचे संवर्धन करतो आहे.

यातून मठाच्या परिसरात सेंद्रिय शेतीचा उपक्रम अधिक गतिमान झालेला आहे. लोकांच्या उपयोगासाठी दूरदृष्टीतून देशी गाईचे संरक्षण व संवर्धन आणि त्यातून चांगल्या जातीची नवीन पिढी तयार करण्याचे काम केले जात आहे. तसेच जल, जमिनी, जंगल, जनावरे आणि जन या पाच ‘ज’चा विचारआचार लोकांना गो परिक्रमेच्या माध्यमातून प्रत्येक गावात पोहोचवतो आहे.

यात गाईचे धार्मिक, आरोग्यदायी, ‘शेती विकासातील महत्त्व आणि गाय संगोपनाचे अर्थकारण समजावून सांगितले जाते. यामुळे शेतकरी कुटुंबात परिवर्तन होऊन एक तरी गाय येऊ लागली आहे. तसेच देशी गाईचे प्रदर्शन भरवून चांगल्या जातिवंत गाईंसाठी एक लाखापर्यंत बक्षिसे दिली जातात. यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अनेक राज्यांतून शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होतात.

आता शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतो आहे. ही चळवळ अधिक जोमाने पुढे येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आमच्या मठावरील गोठ्यामध्ये आज ५५० छोट्या-मोठ्या गाई आहेत. तसेच या ठिकाणी छोटेखानी पशुवैद्यक चिकित्सालय विकसीत केलेले आहे.”

भारत बलशाली, निरोगीमय राष्ट्र म्हणून निर्माण करण्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. शेतकर्‍याने भविष्यातील संधी तथा आव्हान म्हणून सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

– बिभीषण बागल
(लेखक कृषीतज्ज्ञ असून ‘इस्राएलमधील शेती’ हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?