₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct
प्रत्येक मालाचे यश हे त्याच्या वितरणातच असते. समजा पार्ले कंपनीने पार्ले बिस्किटांचे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन केले, करोडो रुपये खर्च करून त्याची जाहिरातबाजी केली, मात्र खेडोपाडी प्रत्येक दुकानात जर पार्लेची बिस्किटे उपलब्धच नसतील तर पार्ले कंपनीने केलेल्या एवढ्या मेहनतीला यश मिळेल का?
तर नाही, कारण जाहिरातबाजीतून ग्राहक निर्माण करता येतो, पण त्याच ग्राहकाच्या हातात तुमचे उत्पादन जाण्यासाठी तुमची वितरण व्यवस्था भक्कम असावी लागते तरच प्रत्येक हातात तुमचे उत्पादन पडू शकते.
आज अनेक उत्पादकांना समोर याच वितरण व्यवस्थेचे आव्हान आहे. त्यामुळे तालुका अथवा जिल्हा पातळीवर एखाद्या उत्पादनाचे वितरण उभे करणे हा पूरक व्यवसायाचा एक चांगला पर्याय आहे. उत्पादकाकडून वितरकाला ठरावीक टक्के सवलत मिळते. त्यातील काही हिस्सा वितरकाचा व काही विक्रेत्याचा असतो.
समजा उत्पादकाकडून 40 टक्के सवलतीत माल खरेदी केला आणि विक्रेत्याला तो 25 टक्के सवलतीत पुरवला तर वितरक त्यात 15 टक्के कमावतो. वितरक हा उत्पादक आणि विक्रेता यांच्यामधील दुवा असतो. वितरणाची एजन्सी सुरू केली असता एकाच प्रकारच्या अनेक उत्पादनांचे वितरण करता येऊ शकते. कमी खर्चात मात्र थोडी मेहनत घेऊन तालुका वा नगर पातळीवर हा व्यवसाय सुरू केल्यास चांगले यश येऊ शकते.