अनेक कंपन्यांमध्ये मालक–कर्मचारी संबंध हा सर्वात कळीचा मुद्दा असतो. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हे याचे एक प्रमुख उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. तर दुसरीकडे इंफोसिस, टाटा, माईंड ट्रीसारख्या कंपन्यांची प्रगती ही त्या कंपन्यांतील मालक–कर्मचारी संबंध हे उत्तम असल्याचेही लक्षात येते.
जेव्हा तुम्ही एखाद्या कर्मचार्याला प्रवेश देता तेव्हा तुम्ही तुमच्या कार्यशक्तीतही एका व्यक्तीने वाढ होत असते. मालक – कर्मचारी यांच्यातील नव्या नात्याची ही सुरुवात असते. हे संबंध दृढ असल्यावरच कंपनीची प्रगती होऊ शकते, कारण हे दोघ मिळून कंपनीच्या प्रगतीसाठी कार्यरत असतात.
सामान्यपणे या दोघांमधील नातं हे किती जवळच असावं, हे त्या दोघांच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतं. पण त्या दोघांनी एकमेकांचा योग्य तो आदर राखणं हे अत्यंत गरजेचं असतं. मालकाने पदाचा योग्य तो मान राखत कर्मचार्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यास तेही मालकाला कायम सकारात्मक प्रतिसाद देतात.
मालक–कर्मचारी यांच्यात परस्पर विश्वास निर्माण होणंही तितकंच आवश्यक आहे. मालकाने आपण दिलेले काम आपले कर्मचारी योग्य वेळेत आणि आवश्यक त्या गुणवत्तेप्रमाणे पूर्ण करतील यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर काम सोपवले, तर ते काम अधिक सुरळीतपणे होऊ शकेल. याच्याच दुसर्या बाजूला कर्मचार्यांनीही आपल्यावर मालकाचा हा विश्वास निर्माण होईल या पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.
कर्मचार्यांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी मालकाने त्यांच्याशी कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्तही संबंध प्रस्थापित करणं गरजेचं असतं. जसे की त्यांचे कौटुंबिक जीवन, त्यातील अडीअडचणी, त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य इत्यादींचीही मालकाला माहिती असावी. अर्थात कोणत्याही गोष्टीत अतिरेक हा वाईटच ठरतो. त्यामुळे प्रत्येक संबंध हे कोणत्या पातळीपर्यंत असावेत, याचा विवेक मालकाने पाळावाच.
मालक–कर्मचारी यांच्या संबंधात कटाक्षाने टाळाव्यात अशा काही गोष्टी म्हणजे मालकाने कर्मचार्याचे कोणत्याही प्रकारचे शोषण करू नये. त्यामुळे मालक–कर्मचारी संबंधात दरी वाढत जाते. याचा परिणाम अन्य कर्मचार्यांवरही होतो आणि एकूणच कार्यालयीन शिस्त बिघडून हवी तशी प्रगती साधता येत नाही.
दुसरे म्हणजे मालक–कर्मचारी यांनी परस्परांत कोणत्याही प्रकारचे प्रेम संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी योग्य तो विवेक पाळावा, कारण मानवी संबंध हे कोणत्याही ठराविक परिमाणांनुसार मोजले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्याचे परिणाम आणि इतर गोष्टींचा विचार हा त्या त्या काळ-वेळ-परिस्थितीनुसार भिन्न असण्याची शक्यता आहे.
– शैलेश राजपूत