
एखाद्या विषयाची तर्कसंगत माहिती ज्यात मिळते ते असते शास्त्र. विज्ञान हे जसे सर्वमान्य शास्त्र आहे तसेच भारतात इतरही अनेक शास्त्र आहेत ज्याचे दाखले आपल्याला आपल्या ग्रंथातून मिळतात. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, मंत्रशास्त्र, अध्यात्म, योगविद्या असे अनेक विषय आपल्या दैनंदिन जीवनावर प्रचंड प्रभाव टाकत असतात, परंतु समाजात याविषयी असणारे समज-गैरसमज, अज्ञान सर्वसामान्य लोकांना नेहमीच संभ्रमित करते आणि त्याचमुळे लोक यापासून दूर राहतात.
शास्त्रशुद्ध पद्धतीने या विषयाची माहिती आणि याविषयीच्या सेवा देण्याचे काम पुण्याच्या डॉ. जान्हवी महाडिक करत आहेत. या लेखात आज त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कामाविषयी जाणून घेऊयात.
डॉ. जान्हवी या मूळच्या पुण्याच्या असल्याने बालपण शिक्षण पुण्यातच झाले. मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर काही वर्ष याच क्षेत्रात त्यांनी नोकरी केली. याच काळात पुण्यात केइएममध्ये डॉ. गंधम नावाच्या मॅडमशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांच्याकडून भारतीय शास्त्राबद्दल माहिती मिळाली.
त्यांच्याकडून या विषयातील अनेक पुस्तके वाचायला मिळाली. यातूनच या विषयाविषयी कुतूहल निर्माण झाले आणि त्यांनी भारतीय वैदिक शास्त्राचा अभ्यास सुरू केला. कधीकधी काही गोष्टींची उत्तरे विज्ञानामध्येही मिळत नाहीत, पण त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम हा होत असतो.
याचा शोध घेतला पाहिजे या विचारातून मग २००६ मध्ये नोकरी सोडून पूर्णपणे त्या भारतीय वैदिक शास्त्रांचा अभ्यास करू लागल्या. या विषयात काम करायचे त्यांनी ठरवले. त्यासाठी याचे शिक्षण घेणे गरजेचे होते. मग त्यांनी ‘वेदांग ज्योतिष’ या विषयात पदव्योत्तर शिक्षण घेऊन मग भारतीय वैदिक वास्तुशास्त्र यात पीएचडी केली.
डॉ. जान्हवी म्हणतात, भारतीय वैदिक शास्त्राविषयी ज्ञान देणारी हजारो ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लेखन आहे, पण कालपरत्वे हे सगळे मागे पडले आहे. लोकं ही शास्त्र मानावीत की मानू नये या विवंचनेत अडकलेत. एखाद्याने ते मानले नाही म्हणून शास्त्र बदलत नाही. पण ते समजून घेतले तर या शास्त्राचा आपल्यालाच फायदा होईल.
आपण विचार करायला हवा की शास्त्र का आणि कसे तयार झाले? या शास्त्रात एवढी ग्रंथसंपदा का निर्माण केली गेली? हे शास्त्र निर्माण करायला ६५ ऋषीमुनींचा संदर्भ मिळतो म्हणजे एवढ्या लोकांनी यावर काम केले आहे म्हणजेच यामागे नक्कीच काही विचार आहे. आपल्याला याचा काय फायदा होईल?
या शास्त्रांचा चांगला अभ्यास असणारी लोक शोधून ही शास्त्रे समजून घेतली पाहिजेत. दुर्दैवाने मूळ ग्रंथातील गोष्टी चुकीच्या पद्धतीने समाजापर्यंत पोहचल्यात त्यामुळे गैरसमज जास्त आहेत. मूळ ग्रंथातील सुत्रे नीट वापरली तर आपले जीवन सुखकर करायला ती मदतच करतात.
अभ्यास नसलेल्या व्यक्तीकडून सल्ला घेतल्याने आपल्याला हवा तो रिझल्ट मिळत नाही आणि तसे झाले नाही तर आपण त्या व्यक्तीला नाही तर शास्त्रालाच दोष देतो. म्हणून लोकांनीही सजग व्हायला हवे. डॉ. जान्हवी महाडिक यांनी महाराष्ट्र शासनाच्या रामटेक येथील संस्कृत विश्वविद्यालयातून शास्त्रशुद्ध पद्धतीने ग्रंथांचा अभ्यास केला आहे.
डॉ. जान्हवी यांना विश्वास आहे की आज तंत्रज्ञान आणि भारतीय वैदिक शास्त्र याचा जर योग्य मेळ घातला तर ते लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवता येते आणि ते पुनर्जीवीतही करता येईल. ज्योतिषशास्त्र हेसुद्धा आकाशातले ग्रह, तारे त्यांच्या रचना त्यातील बदल याचे आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतील तर वेळीच आपल्याला दाखवून देते.
ज्योतिषशास्त्र हे भविष्यच नव्हे तर आपल्याला योग्य दिशा दाखवते. आजच्या तरुण पिढीला हे विज्ञान आहे हे पटवून दिले की ते यावर विश्वास दाखवतात. मुख्य म्हणजे आज हा बदल समाजात होऊ लागलाय. डॉ. जान्हवी यांनी ‘वास्तुविद्या’ हे पुस्तक संग्रहित केले आहे.
मूळ ग्रंथातील भाषा आणि आजची वापरातील भाषा याचा मेळ करून हे पुस्तक संग्रहित केले आहे. याचा उद्देश हाच आहे की मूळ ग्रंथातील माहिती जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहचावी. हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर गुजराती भाषेत भाषांतर चालू आहे.
आजच्या पिढीसाठी ऑडिओ फॉरमॅटमध्येसुद्धा हे उपलब्ध आहे. ‘शास्त्र विथ जान्हवी’ या नावाने त्यांचे युट्युब चॅनेल आहे. दर रविवारी त्या सर्वांना भारतीय शास्त्रांची ओळख व्हावी या हेतूने वर्ग घेतात. याद्वारे शास्त्र, नक्षत्र, ज्योतिष असे विषय लोकांपर्यंत पोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमांचा वापरही नव्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी त्या करतात. अनेक मंचावरून त्या याविषयी व्याख्याने देतात. त्यांचे ‘वास्तुविद्या’ नावाचे एक शैक्षणिक अॅप आहे. त्यावर काही पूर्व रेकॉर्डिंग कोर्सेस सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेत.
वास्तुशास्त्राचे बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्सेस, ज्योतिष शास्त्राचे बेसिक आणि अॅडव्हान्स कोर्सेस. काही उपासना आणि त्यांचे कोर्सेस याशिवाय अनेक कोर्सेस या अॅपमध्ये आहेत. वेगवेगळ्या विद्या यात शिकवल्या जातात. ट्रेनिंग दिले जाते. वास्तुशास्त्रसंबंधीत लोकांना कन्सल्टन्सी दिली जाते. त्यांच्या सेवा भारतातच नव्हे तर परदेशातही दिल्या जातात.
अॅस्ट्रोबुस्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या त्या संचालक आहेत. या कंपनीत भारतीय वैदिक शास्त्रातले जवळजवळ ७० तज्ज्ञ काम करतात. यात ज्योतिषी, वास्तुतज्ज्ञ, आर्किटेक्ट, कर्मकांड करणारे गुरुजी असे विविध विषयातले अभ्यासू जोडलेले आहेत.
डॉ. जान्हवी यांच्यासोबत चार लोक काम करतात. या कंपनीच्या माध्यमातून विविध विषयात कन्सल्टन्सी दिली जाते. ऑनलाईन कन्सल्टिंग केले जाते. विविध विषयातले तज्ज्ञ एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर एकत्रित काम करतात. वास्तुविद्या शास्त्रने यात नुकताच हरियाणा गव्हर्मेंटचा एक प्रोजेक्ट पूर्ण केलाय. हे एक टीम वर्क होते.
याशिवाय ‘महामेरू साधना’ या एका मेडिटेशन व रिसर्च सेंटरच्या त्या विश्वस्त आहेत. पाली रस्त्याला हे अनुसंधान केंद्र उभारले आहे. इथे बारा जण काम करतात. आयुर्वेदाला जसे भारतीय शास्त्र म्हणून जगभर ओळखले जाते. त्याला मान्यता मिळालेली आहे त्याच पद्धतीत इतरही शास्त्रांना ओळख आणि मान्यता मिळावी यावर काम करण्याचा त्यांचा भविष्यातला उद्देश आहे.
डॉ. जान्हवी म्हणतात, मला असे वाटते की आपली शास्त्र ही उच्च कोटीची आहेत. हा खूप मोठा खजिना आहे. सर्वसामान्य लोकांनी आपल्या प्रगतीसाठी आपल्या विकासासाठी त्याचा उपयोग कसा आहे हे एक शास्त्र म्हणून जाणून घ्यायला हवे.
अभी साज़-ए-दिल में तराने बहुत हैं
अभी ज़िंदगी के बहाने बहुत हैं
दर-ए-ग़ैर पर भीक माँगो न फ़न की
जब अपने ही घर में ख़ज़ाने बहुत हैं
संपर्क : 9850888122


