कोरोनाच्या काळात, जग थांबलेलं असताना जयदीप शिकण्यात रमले. वित्तविषयक पुस्तके, व्हिडिओ, प्रशिक्षणांच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रातील अनेक गोष्टी समजून घेतल्या. ‘रिच डॅड पुअर डॅड’ हे पुस्तक त्यांच्या हाती आलं आणि तिथून पैशाकडे नव्या नजरेने पाहण्याची सुरुवात झाली.
पैसे कमावणं आणि त्याचं नियोजन करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे त्यांना खोलवर उमजलं. पैसा कमावणे हे आजच्या काळात आवश्यक आहेच, पण त्याहून महत्त्वाचं असतं ते पैशाचं नियोजन आणि व्यवस्थापन. आर्थिक साक्षरतेचं हे शहाणपण अनेकांना आयुष्याच्या एका टप्प्यानंतरच उमगते.
वित्तविषयक हा अभ्यास सातार्याच्या जयदीप विलास कोरे यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला आणि त्यातूनच त्यांनी ‘जे के फायनान्सियल सर्विसेस’ या नावाने आपला व्यवसाय सुरू केला. विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी २००८ पासून काही वर्षे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलं, पण २०१३-१४ मध्ये म्युच्युअल फंडातील पहिली छोटी गुंतवणूक त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय लिहून गेली.
अर्थविषयी मिळालेलं ज्ञान आता समाजासाठी उपयोगात आणायचं ठरवलं. २०२० पासून त्यांनी लोकांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक, विमा आणि फायनान्शियल फ्रीडम याबद्दल सल्ला द्यायला सुरुवात केली. पुढे त्यांनी सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर म्हणून कारकीर्द सुरू केली.
जयदीप यांच्या मते, आर्थिक नियोजनात सल्लागाराची भूमिका म्हणजे महाभारतातील श्रीकृष्णासारखी. पाच पांडवांच्या विजयामागे जसा मार्गदर्शक होता, तसाच सल्लागार कोणाही व्यक्तीला योग्य दिशेने नेतो. आपल्याकडे ‘पैशाचं आरोग्य’ सांभाळण्यासाठी सल्लागाराची गरज आहे, हे अजून लोकांना पटलेलं नाही.
माझा पैसा, माझा निर्णय. लोकांचा हा दृष्टिकोन आहे. पण, अज्ञानातून घेतलेले निर्णय अनेकदा महागात पडतात. फसवणुकीच्या योजनांमध्ये पैसा बुडवून लोक पुन्हा त्याच जाळ्यात अडकतात. यामागे कारण आर्थिक साक्षरतेचा अभाव आणि लवकर श्रीमंत होण्याचं आकर्षण ही आजच्या काळातली मोठी समस्या आहे.
जयदीप यांची कार्यपद्धती अशी आहे की ते प्रत्येक ग्राहकाला फायनान्शियल प्रॉडक्ट सुचवण्यापूर्वी त्या गुंतवणुकीतील धोके, अडचणी आणि त्यावरचे उपाय याविषयी सविस्तर माहिती देतात. पारदर्शकता आणि जबाबदारी ही त्यांच्या कामाची दोन मुख्य तत्त्वं आहेत.
ते ग्राहकाला सांगतात, तुम्ही ज्या प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करता आहात, त्याची स्वत: खातरजमा करा. त्यासाठी ते सेबीचे नियम, लायसन्स तपासणीचे मार्ग, आणि अधिकृत तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रिया स्पष्ट करतात. ही पारदर्शकता ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करते आणि तोच विश्वास त्यांच्या यशाचा पाया आहे.
अनेकांच्या मते म्युच्युअल फंड म्हणजे रिस्क, पण हा गैरसमज आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट हे एकच आहेत, असा समज चुकीचा आहे. म्युच्युअल फंडात तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक केली जाते त्यामुळे तुलनेने धोका कमी असतो. आज २०० रुपयांपासूनही गुंतवणूक शक्य आहे आणि गरज पडल्यास एका दिवसात पैसे पुन्हा खात्यात परत मिळू शकतात.
त्यांच्या सल्ल्यानुसार हेल्थ, लाइफ आणि टर्म इन्शुरन्स हे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक सुरक्षिततेचे आधारस्तंभ आहेत. जास्त परतावा मिळवणं हेच यश नाही; तर धोके कमी करून केलेली गुंतवणूक योग्य आहे.
पूर्वी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते दुसर्यांच्या उत्पादनांची विक्री करत होते. आज स्वत:चा फायनान्स व्यवसाय उभारून ते लोकांना आर्थिक मार्गदर्शन देतात. त्यांच्या मते, काम बदललं नाही तर फक्त ‘कोणासाठी सेल करतो’ हे बदललं. त्यांचा स्वभाव मदत करण्याचा आहे आणि त्याच भावनेतून ते आज लोकांना योग्य आर्थिक सल्ला देतात.
फायनान्स क्षेत्रात अनेकदा कमिशनसाठी चुकीचे प्रॉडक्ट विकणे ही समस्या आहे, पण जयदीप यांचा ठाम विश्वास आहे की ग्राहकाला चुकीचा सल्ला देऊन मिळालेलं यश तात्पुरतं असतं. प्रामाणिक सल्ल्यामुळे तयार झालेला विश्वास कायम राहतो.
आपल्या व्यवसायात जयदीप आज डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करतात. व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया, प्रशिक्षण सत्रं आणि व्हिडिओंद्वारे ते आर्थिक जागरूकतेचं बीज पेरत आहेत. त्यांचा उद्देश केवळ गुंतवणुकीचं प्रमोशन नव्हे, तर लोकांना पैशाबद्दल सजग बनवणं आहे.
भारतामध्ये म्युच्युअल फंड क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. लोकांमध्ये हळूहळू या विषयाची उत्सुकता वाढते आहे. अजूनही हे प्रमाण कमी असलं, तरी त्यातील सकारात्मकता स्पष्ट जाणवते. जयदीप कोरे यांचं म्हणणं आहे, प्रत्येकाने आपली काही तत्त्वं ठरवली पाहिजेत. ग्राहकाच्या गरजा ओळखून काम करा, फायद्यासाठी नव्हे तर विश्वासासाठी व्यवसाय करा.
संपर्क : 9021877706


