श्रीमंतीचे दार म्हणजे उद्योजकता. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की, ‘उद्यमेन् ही सिद्ध्यंती, कार्याणि न मनोरथै। न ही सुप्तस्य सिंहंस्य प्रविशंती मुखे मृग:॥’ म्हणजेच उद्योग केल्याशिवाय फळ मिळू शकत नाही. व्यावसायिक जीवनात हाच उद्योग स्वयंप्रेरणेने करणं म्हणजेच उद्योजकता.
उद्योग ही एक घुसळण आहे. चांगल्या शब्दांत सांगायचे झाले तर मंथन आहे. या मंथनातून अमृत बाहेर येणार आहे. हे अमृत म्हणजेच श्रीमंती. श्रीमंती म्हटलं की आपल्यासमोर फक्त लौकिक वैभवच उभे राहते; पण ही संकल्पना अर्धसत्य आहे. श्रीमंती फक्त पैशांची नसते, ती विचारांची असते, तत्त्वांची असते.
अनेक जण असे असतात की जे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले असतात.म्हणजेच श्रीमंती ही त्यांच्या पूर्वजन्माच्या उद्यमतेचं संचित म्हणून त्यांना या जन्मात मिळालेली असते. पण काही भाग्यवान असेही असतात की ज्यांना याची देही, याची डोळा ही श्रीमंती उभी करण्याची संधी मिळते. अशा सर्व श्रीमंतांसाठी वा श्रीमंतीचं दार आहे उद्योजकता.
म्हणूनच आपण अशा शून्यातून विश्व उभ्या करणार्या पहिल्या पिढीतील उद्योजकांच्या कथा वाचतो. त्यातून प्रेरणा घेतो. तुम्हाला ठाऊक आहे का यश संपादन न करू शकलेले उद्योजकही श्रीमंत असू शकतात. त्यांच्याकडे अयशस्वीतेच्या अनुभवांची श्रीमंती असते. अशाप्रकारे पैसा, तत्त्व, अनुभव आदींच्या श्रीमंतीचे दार उघडते उद्योजकता.
– शैलेश राजपूत