शहरी शेतीच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून दिलेला तरुण

एखादा धनसंपन्न असलेला मनुष्य आजारपणाला कंटाळलेला, अंथरुणावर खिळलेला असेल आणि त्याला विचारलं की खरी संपत्ती कोणती तर तो निशंकपणाने सांगेल की, आरोग्य हीच खरी संपदा आहे. “आरोग्यम् धनसंपदा”. आरोग्य चांगले असेल तर धन संपत्तीत वाढ होईल. आधुनिक युगात माणूस हा आनंद व सुखाच्या शोधात असतो. सुखासाठी साधन, संपत्ती मिळवण्यासाठी धडपड करतो. तो पैशाने श्रीमंत, स्थिर होतोही, पण आपले अनमोल असे आरोग्य गमावून बसतो. ना खाण्यापिण्याकडे लक्ष, ना रोजच्या व्यायामाकडे. त्यातच आपण खात असलेले अन्न ही रसायनं टाकून पिकवलेलं असेल तर “थाली में जहर”च!

शेतीचं जसं जस यांत्रिकीकरण होऊ लागलं तसतसं अन्नधान्य पिकवण्यासाठी रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशंकाचा वापर वाढू लागला. ज्या भाकरीच्या श्वाश्वतीत तो धडपडू लागला. त्या विषारी भाकरीनेच त्याचा घास कधी घेतला हे त्याच त्यालाच कळलं नाही. कधी ऐकले नाहीत असे आजार व त्याला जोगोजागी कर्करोग होऊ लागले. बरं हे मानव प्राण्यापुरतच मर्यादित राहिलं नाही, तर जल, जंगल, जमीन, पशू, पक्षी यांनाही मारक होऊ लागलं. त्यातच वाढत्या शहरीकरणामुळे डंपिंग ग्रांऊड वाढू लागलेत.

माणसं शहरात नाही तर कचर्‍याच्या कुंडीत राहू लागलेत असे म्हटले तरी चालेल. यावर उपाय काय? यावर असा उपाय पाहिजे, जो लोकांना मनापासून पटला पाहिजे. त्यात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. नुसता सहभाग नाही. तनमनधन देवून तो सहभाग घेता आला पाहिजे. हे शक्य आहे का? हो शक्य आहे. ही गोष्ट आहे नाशिकच्या तरुणांची, फक्त गोष्ट नाही, तर उद्योगारंभातील एका टप्यावरची. यशोगाथा ‘स्मार्ट उदयोजक’च्या वाचकांसाठी.

आमीर खान निर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात शेतीमध्ये रसायनांचा वाढता वापर व त्याचे दुष्परिणाम यावर एक भाग होता. या भागातून प्रेरणा घेत नाशिकच्या संदीप चव्हाण यांनी आपली शेतीची, निसर्गाची, कचरा व्यवस्थापनाची आवड व छंदाचे रूपांतर उद्योगात करून व्यवसायाची मुहर्तमेढ रोवली. उद्योगाचं नाव ठेवलं ‘गच्चीवरची बाग’.

गाव मागच्या पिढीतच सुटलं होतं, पण गावाची, शेतीची ओढ कायमच. त्यातच आयुष्याच्या एका टप्प्यावर जाणवलं की आपल्याला शहरातील व त्यातल्या त्यात माध्यमांतील नोकरीपेक्षा शेतीत आवड जास्त आहे. नोकरीत एक तप पूर्ण झालं होतं, पण त्यातील हेवदावे, स्पर्धा कधीच संपणारी नव्हती व हे सारे रात्रदिवंस कष्ट हे नेमके कुणासाठी हा यक्ष प्रश्न उभा राहिला आणि एक दिवस नोकरीला राम राम ठोकला.

आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं याचा विचार केला. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला निसर्गाची खूप आवड आहे. शेती केली पाहिजे. त्यातच पुणे, मुंबई, नाशिकात कचरा वेचणार्‍यांचा प्रश्न ऐरणीवर होता. नाशिकचे डंपिंग ग्रांऊडही एकदा पालथ घालून झालं. त्यातून आपला ओला कचरा आजपासून फेकायचा नाही असा मनाशी निश्चय करून वैयक्तिक पातळीवर विविध प्रयोग पूर्वीच सुरू झाले होते. या कचर्‍याचं काहीतरी करू म्हणून केलेली सुरुवातच यशस्वीतेत होत गेली. विविध प्रयोगांना हाती यश लागलं आणि त्यातून सुरू झाला गच्चीवरची बागेचा प्रयोग.

विदेशी पाहुण्यांना ‘गच्चीवरची बाग’ समजावून देताना संदीप चव्हाण

बाजारातून काहीही विकत आणायचं नाही. हे विकत आणणंच खरं तर शेतकर्‍याला व शेतीला संपवत आहे, या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला अभ्यास आता प्रत्यक्ष कृतीत आणण्याची वेळ होती. ती सिद्ध झालीसुद्धा. ‘गारबेज टू गार्डन’ अशी संकल्पना घेवून घरच्या घरीच रसायनमुक्त भाजीपाला कसा पिकवायचा या विषयी प्रयोग यशस्वी झाले. या अनुभवातून ‘गच्चीवरची बाग’ हे पुस्तकही प्रकाशीत झालं.

पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला. ही गोष्ट आहे २०१४ मधली. विविध वर्तमानपत्रांव्दारे नाशिकमधे जागृती झाली. आता तर सोशल मीडियामुळे याला चांगला प्रतिसाद मिळतोय. उदयोजकतेचे धडे वाचताना एक गोष्ट कळली की एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून साकारताना तो १ हजार दिवस चालवून पाहावा. जमला, टिकला तर तो अंगाखांद्यावर खेळवावा. झालंही तेच पहिली तीन वर्षं याला चांगला प्रतिसाद मिळाला.

उपलब्ध वस्तू, उपलब्ध जागा व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीत बाग कशी फुलवावी याचे बारकावे शिकले. ‘गच्चीवरची बाग’चं घोषवाक्य आहे, “पालापाचोळा, किचन वेस्ट, चला फुलवू या बगीचा बेस्ट” यातूनच त्यांच्या कामाची ओळख होते. औषधं ही नखभर असतात, पण त्यांचे दुष्परिणाम मोठे असतात. पण घरच्या रसायमुक्त भाज्या औषधांपेक्षा सकारात्मक काम करतात. भारतीय पाककला ही फक्त उदरभरण नाही तर पूर्णब्रम्ह आहे. फक्त त्याला लागलेला रसायनरूपी व्हायरस काढून टाकला पाहिजे. असे निसर्गाने अनेक अनुभवांच संचीत पदरात ओतलय.

हे फक्त त्यांच्याशी चर्चा करताना समजून येते. तर अशा अनुभवाधारावर गच्चीवरची बाग हे पुस्तक प्रकाशीत झालं. अशा अनुभवाआधारीत पुस्तक विक्रीतून घरोघरी पे कंन्सलटंसी सुरू झाली. कंन्सलटंसीतून २० टक्के माती व ८० टक्के पालापाचोळातून भाजापाल्याची बाग फुलूवून देण्याचे काम सुरू झाले. त्यातून नैसर्गिक खते, गोपालन, त्याआधारित कीटकनियंत्रके यांची निर्मिती सुरू झाली व सुरू झाला आवडीच्या उद्योगाच्या शिडात हवा भरण्याचं काम.

गच्चीवरही शेती केली जाऊ शकते याचे धडे घेताना शहरी विद्यार्थी

३१ मार्च २०१९ ला ‘गच्चीवरची बाग’ला सहा वर्ष पूर्ण झाली. सातव्या वर्षात पदार्पण झालंय. एकाट्याच्या खांद्यावर पेलण्याचं उद्योग धनुष्य आता सात जणांच्या खाद्यांवर वाटलं गेलंय. ताफ्यात आता छोटा हत्ती आहे. देशी गाय आहे आणि हे सारं करण्यासाटी छोटी हक्काची जागा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभावाचं ज्ञान, जे अक्षय्य आहे. थायलंड, झिम्बांव्बे या देशातील विषमुक्त शेती, किचन गार्डनसोबत भारतातील विविध शेती प्रयोगांचाही प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करत या संकल्पनेचा पाया रचला गेला. घरच्या बागेत पिकवलेल्या भाज्यांतून, आलेल्या अनुभावतून ‘गच्चीवरची बाग’ पुस्तकाची पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती प्रकाशीत झालीय.

सोबत “तुम्हाला माहीत आहे का?” या दुसर्‍या पुस्तकाचीही जोरदार विक्री सुरू आहे. “तुम्हाला माहित आहे का?” हे पुस्तक म्हणजे संदीप चव्हाण यांनी गच्चीवरची बाग या विषयावर घेतलेल्या कार्यशाळांमध्ये सांगितलेलं आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन या विषयीचे मुद्दे संकलित करण्यात आले आहेत. हे पुस्तक वाचतांना तर आपण त्यांची कार्यशाळाच अनुभवत आहोत असे वाटते. जे वाचकांसाठी आय ओपनींग ठरावं.

संदीप चव्हाण यांनी नाशिकमध्ये पाचशे घरांत भाजीपाला पिकवण्याचे काम सुरू केले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना बाग फुलवण्यास प्रेरीत केले आहे व तितकीच लोक रोज संपर्कात असतात. बाग-कचरा व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारतात. त्यांच्या कामाची विविध दृकश्राव्य तसेच मुद्रित माध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल तर घेतली आहे. सध्या www.gacchivarchibaug.inwww.organic-vegetable-terrace-garden.com अशी दोन संकेतस्थळे आहेत. यावर आपण नक्कीच भेट देवून अधिक माहिती जाणून घेवू शकता व त्यांच्या संपर्कात राहू शकता.

उद्योग म्हणून पाहताना आपल्या अंगी सहनशक्ती, प्रतिक्षा ही असली पाहिजे. कोणताही उद्योग अल्लाउदीनच्या दिव्यासारखा पेटला नि सार्‍या ईच्छा क्षणात पूर्ण झाल्या असे होत नाही. उद्योजकाला निरंतर सृजनशिलतेच्या कार्यात गुंतून घ्यावं लागतं. आजची रचलेली किंवा समोर टाकलेली एक विट ही भविष्यातील वाटचालीत पाय ठेवण्यासाठीची फूटस्टेप बनते, हे संदीप चव्हाणांचं म्हणणं आहे.

उद्योग म्हटला म्हणजे तारेवरची कसरत असतेच, पण नोकरीसारखं बॉसच्या हातातलं माकड तर नक्कीच नसतो. अंगी प्रामाणिकपणा, योग्य तो कामाचा दाम घेण्याची व देण्याची तयारी असेल तर कल्पना प्रत्यक्षात साकारायला वेळ लागत नाही हे या उदाहरणावरून नक्कीच जाणवते.

संपर्क : संदीप चव्हाण
९८५०५६९६४४


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?