आपल्या गरीबीचे कौतुक करणारे खरे तर मनातून हरलेले असतात… पैसे प्रत्येकालाच कमवायचे असतात, पण आपली मर्यादा लक्षात आली की श्रीमंतीपेक्षा आपली गरीबी किती चांगली हे कौतुकाने सांगायची सुरुवात होते. मग “पैसा सर्वस्व नाही”, अशी वाक्ये समोरच्याच्या कानावर आदळवली जातात. पण हे वाक्य फक्त श्रीमंतांच्याच तोंडी शोभतं. गरीबाच्या नाही हे लक्षात घ्या.
श्रीमंत होणे हा आपला हक्क आहे. ती कुणाची मक्तेदारी नाही. टाटा, अंबानी, बिल गेट्स, झुकरबर्ग, बफे, बेझोस हे लोक आकाशातून पडलेले नाहीत की त्यांच्याकडे श्रीमंती चालून आली आहे असे नाही. यांनी आपल्या कष्टाने मेहनतीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. आपले उद्योगविश्व उभे केले आहे.
या पंक्तीत बसण्याची जगातील प्रत्येकाला संधी आहे. जगातील अतिश्रीमंतांची यादी पाहिली आणि त्यांच्या व्यवसायाची सुरुवात, त्यांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की यातल्या ९० टक्के श्रीमंतांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती किंवा अतिशय हलाखीची होती.
यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात अतिशय कमी पैशातूनच केली होती, पण आपल्या बुद्धीच्या, कौशल्याच्या, निर्णयक्षमतेच्या बळावर या लोकांनी आज जगातील उद्योगविश्वावर आपले अढळ स्थान निर्माण केलेले आहे.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
आपण पैशाने नाही मनातून गरीब आहोत. पैसा आपल्या आसपास आहे. तो आपली वाट पाहतोय, पण आपण या लोकांइतके मोठे होणे आपले काम नाही ते मोठ्या लोकांचे काम आहे असली विद्वत्ता पाजळत बसलो आहोत आणि जो पैसा आपली वाट पाहत आपल्या आसपास रेंगाळत बसलाय त्याला आपल्यापासून दूर जायला भाग पडतोय.
पैसा तुमची वाट पाहण्यात आपला वेळ वाया घालवत नाही, त्याच्यासाठी झगडणार्याकडे तो स्वत:हून जातो. पैसा हा लोहचुंबकासारखा असतो. तो त्याच्याकडेच जातो जो त्याचा विचार करतो. त्याच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करतो. पण इथे तर आपण स्वत:लाच कमी समजतोय, स्वत:लाच भिकारी समजून वागतोय.
आपण ठरवून घेतलय की श्रीमंत होणं माझ्या नशिबात नाही. पोटापाण्यापुरतं मिळालं तरी पुरे हे आपण स्वत:लाच दररोज ओरडून ओरडून सांगतोय.
बाबांनो, पोटापाण्यापुरतं नाही माझी स्वप्न पूर्ण करण्यापुरती तरी श्रीमंती मला मिळवायचीच आहे, हे स्वत:ला सांगणे आवश्यक आहे. फक्त आपले स्वप्न घर आणि गाडी घेण्यापुरते मर्यादित असू नये.
श्रीमंतीची आस बाळगणे यात काहीच गैर नाही. हा प्रत्येकाचा हक्क आहे. ज्याला या हक्काची जाणीव होते तो श्रीमंत होतोच. बाकीचे ते आपले काम नाही याच भ्रमात वावरतात.
तुम्ही आता श्रीमंत नसालही, त्याने काहीच फरक पडत नाही, पण म्हणून आपल्या गरीबीचे कौतुक करण्यात काहीच हासील नाही. तुम्ही मानसिकतेने गरीब असाल तर भविष्यातही तुम्ही श्रीमंत होण्याची काडीचीही शक्यता नाही.
श्रीमंती म्हणजे फक्त भरमसाठ पैसे कमावणे असे नाही. तर तो कमावलेला पैसा मनसोक्तपणे उपभोगता येणे म्हणजे श्रीमंती. त्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी पुरेसा वेळ असणे म्हणजे श्रीमंती. पैसा कमवा आणि त्याचे नियोजन असे करा की त्याचा पूर्णपणे उपभोग घेता येईल.
आणि हो! जगातील सर्व अब्जाधीश हे उद्योजकच आहेत. दोन पाच कंपन्यांचे सीइओ सोडले तर जगभरात श्रीमंत हे फक्त उद्योजकच आहेत. श्रीमंती व्यवसायानेच येते, नोकरीने नाही. टॅक्स वाचवण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी काढणारे कधी श्रीमंत होत नाहीत. पैसे वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे श्रीमंत होत असतात.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.