अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. पूर्वी लोक जास्तीत जास्त पदार्थ घरी बनवून खात असत. स्त्रियांनी बाहेर रस्त्यात उभं राहून खाणं तर असभ्यपणाचं लक्षण मानलं जात असे; परंतु आता सर्रास लोक बाहेर खाऊ लागले आहेत आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चाललं आहे.
तुमचे मित्र, नातेवाईक, ओळखीचे लोक कुठल्या ना कुठल्या तरी मोठ्या ऑफिसात नोकरीला असतील. उदाहरणार्थ नरिमन पॉइंट, कफ परेड इत्यादी विभाग. इथल्या ऑफिसमध्ये ओळख काढायची, त्यांच्या गरजांचा अभ्यास करायचा व पोळी-भाजी, पुलाव, झुणकाभाकर इत्यादींची पाकिटे पुरवायची!
थोडासा जम बसल्यावर तुम्हाला आठवडा/पंधरा दिवसांचे पैसे अॅडव्हान्स मिळायला हरकत नाही. हा धंदा आणखी वाढवायचा असल्यास प्रत्येक ऑफिसमध्ये आपला एखादा एजंट नेमायचा व त्याला दहा ते पंधरा टक्के कमिशन देऊन त्याच्यामार्फत सर्व व्यवहार करून घ्यायचे.
हे फारसं कठीण नाही, कारण या धंद्यात चांगलाच म्हणजे सुमारे ५० टक्के नफा आहे व जोपर्यंत माणसाला भूक आहे तोपर्यंत या धंद्याला मरण नाही. तुम्हाला कामाची लाज वाटत नसेल (डिग्निटी ऑफ लेबर) तर तुम्ही रस्त्यात एखादी टपरी टाकूनही स्वत:च हा धंदा व्यवस्थित करू शकता.
टीप : घरात ताई, माई, आई, मावशी इत्यादी सुगरण मंडळी असतात. त्यांना यामध्ये स्वारस्य असल्यास व फावला वेळ असल्यास हा कौटुंबिक व्यवसाय करावयाला हरकत नाही. त्याला घरगुती, कुटुंबसखी, सुगरण आदी नावे देऊन पुढेमागे तो मोठ्या प्रमाणावर करता येईल.