बँकेचे उंबरठे न झिजवता आता ‘मुद्रा’ कर्ज मिळणे शक्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ लघु आणि सूक्ष्म गटातील उद्योजकांसाठी मुद्रा योजना आणली. या योजनेअंतर्गत उद्योजकांना ₹५०,००० ते १०,००,००० पर्यंत व्यावसायिक कर्ज मिळू शकते म्हणून या योजनेबद्दल लघुउद्योजकांमध्ये उत्साह होता. परंतु प्रत्यक्ष योजना मिळवण्यामध्ये येणाऱ्या अडचणी पाहून उद्योजकांनी या योजनेकडे पाठ फिरवली.

योजनेचा लाभ मिळवण्यातली सर्वात मोठी अडचण ही होती की योजनेची अमलबजावणी सर्वस्वी बँकांच्या व बँक अधिकाऱ्यांच्या हातात होती. अशी कोणी योजना आमच्या बँकेत नाहीच, अशीही उत्तरं अनेकांना बँकेतून मिळाली. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने आता एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

‘जनसमर्थ’ हे या पर्यायाचे नाव आहे. केंद्र सरकारने ‘जनसमर्थ’ या नावाने एक वेब पोर्टल सुरू केलं आहे, ज्याची रचना वित्त आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय यांनी मिळून केली आहे. सध्या यावर भारत सरकारच्या तेरा क्रेडिट linked योजना उपलब्ध आहेत आणि भविष्यात यामध्ये आणखी योजना उपलब्ध होणार आहेत.

‘जनसमर्थ’ पोर्टलवर कर्जांची प्रामुख्याने चार गटात विभागणी केलेली आहे. ज्यात कृषी उद्योग, व्यावसायिक कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि जीवनावश्यकतेसाठी कर्ज हे प्रकार मोडतात. यामध्ये व्यावसायिक कर्जात मुद्रा योजना, स्टॅण्डअप इंडिया, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, फेरीवाल्यांसाठी स्वनिधी योजना यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

‘जनसमर्थ’ पोर्टलवर तुम्ही तुमचं अकाऊंट तयार करून त्यात तुम्हाला हव्या असलेल्या व्यावसायिक कर्जाविषयी ऑनलाइन अर्ज करायचा. हे कर्ज ₹१०,००,००० च्या आत असेल तर तुम्हाला ‘मुद्रा योजने’अंतर्गत कर्ज उपलब्ध होऊ शकतं.

तुम्हाला PAN नंबर आणि आधार नंबर ऑनलाइन व्हेरिफकेशन करून तुम्हाला कोणकोणत्या बँकेतून कर्ज उपलब्ध होऊ शकते, याची यादी समोर येते. पुढे प्रक्रिया केल्यावर तुम्हाला ऑनलाइनच कर्जमंजुरी केली जाते. कर्जमंजुर झाल्यानंतर कर्जमंजुरीचे पत्र आणि तुमचे कागदपत्र तुम्ही निवडलेल्या बँकेत जाऊन दाखल करावे लागतात आणि तिथूनच तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जाते.

‘मुद्रा योजने’अंतर्गत तुम्ही घेत असलेल्या या कर्जाची हमी CGTMSE योजनेद्वारे सरकार घेत असल्यामुळे बँकेला इतर काही तारण वगैरे द्यावे लागत नाही.

तुम्ही ‘मुद्रा योजने’अंतर्गत कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर या पद्धतीने जरूर प्रयत्न करून बघा. बँकेच्या खेपा मारत राहण्यापेक्षा हे सोपे आणि जलद आहे.

– शैलेश राजपूत

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?