चालू व्यवसाय विकत घेताना कोणती काळजी घ्याल?

आपण बरेचदा वर्तमानपत्रात वाचतो की, एका मोठ्या कंपनीने एक छोटा व्यवसाय विकत घेतला. अनेकदा तुम्ही ऐकले असेल, एका व्यावसायिकाने त्याच्याच क्षेत्रातील एक डबघाईला आलेला व्यवसाय विकत घेतला. हे लोक असे का करतात? बहुधा विस्तारीकरण हे उत्तर असावे.

हे सगळे कसे होते? काय पूर्वतयारी अथवा अभ्यास असतो का यामागे? चला तर, चालू व्यवसाय विकत घेताना कोणती काळजी घ्यावी लागते ते पाहू या. या विक्री प्रक्रियेचे मुख्य चार स्तंभ आहेत- संघ, तंत्रज्ञान, त्यासाठी वापरलेली शक्ती आणि मार्गक्रमण.

संघ

तुम्ही विकत घेणार्‍या कंपनीची नाडी ओळखायची असेल तर त्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ते शिपायापर्यंत सर्वांना जाणून घेणे आवश्यक आहे. कोण कुठल्या हुद्द्यावर आहे आणि किती कुशल आहे हा अभ्यास करणे गरजेचे आहे. यावरून तुम्हाला ती कंपनी मिळवायची की नाही हे ठरवता येईल.

त्या कंपनीचा आणि तेथील कर्मचार्‍यांचा तुम्हाला किती व कितपत फायदा होईल याची आखणी करता येईल. तेथील कर्मचार्‍यांना त्यांच्या उत्पादनाची, ग्राहकांची आणि विक्री तंत्रज्ञानाची सखोल माहिती असणे अनिवार्य आहे. या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यवसायाला खूप फायदा होईल. एक मजबूत संघ कुठलेही आव्हान यशस्वीरीत्या सर करू शकतो.

तंत्रज्ञान

आपण विकत घेत असलेली कंपनी कोणते तंत्रज्ञान वापरते हे जाणून घेणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचे परीक्षण करणेही खूप गरजेचे आहे. अनेक कंपन्या काही गोष्टी गुप्त ठेवतात. ही गुप्तता त्याच्या उत्पादनाशी किंवा उत्पादन पद्धतीशी निगडित असते.

अशा गोष्टी थोड्या अवघड स्वरूपाच्या असू शकतात, पण जर त्यांचे तंत्रज्ञान एकदा समजले, तर या सर्व गोष्टी सोप्या व सरळ होऊन जातात. यालाच कॉर्पोरेट भाषेत यू.एस.पी. (अद्वितीय विक्री विधान) असे म्हणतात. हे सहभागी तंत्रज्ञान किंवा बौद्धिक मालमत्ता, एक रचना, कोड किंवा एक प्रक्रिया असू शकते, जेणेकरून त्या कंपनीला बाजारपेठेत एक वेगळे स्थान मिळवता येते.

उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीचे बिस्कीटच खूप लोकप्रिय आहे, कारण त्यांची पाककृती वेगळी आहे. एकाच कंपनीचे औषध एका अमुक रोगासाठी बहुतेक वेळा वापरले जाते. हे सर्व तंत्रज्ञान कंपनी विकत घेताना तुम्हाला कशा स्वरूपात व किती मिळते आहे हे समजून घेणे अतिआवश्यक आहे.

मूल्यांकन

संपादन केलेली कंपनी तुम्हाला कसा नफा दाखवेल या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे. कंपनी छोटी व अजून अज्ञात आहे या आधारावर कंपनीला कमी लेखू नका. त्या कंपनीची आतापर्यंतची वाटचाल, उत्पादन आणि ग्राहकबळ या सर्व गोष्टी आपल्याला किती व कसे यश प्राप्त करून देतील याचे सखोल मूल्यांकन अनिवार्य आहे.

याउलट जर संपादन केलेली कंपनी सुप्रसिद्ध आणि मोठ्या संघाची आहे म्हणून खूश होऊ नका. त्या कंपनीची वाटचाल, उत्पादन आणि ग्राहकबळ आपल्याला किती फायदेशीर आहे ते तपासून पाहा. त्या कंपनीने दिलेल्या सेवेत नावीन्य आहे का? अथवा ते इतरांपेक्षा किती व कसे वेगळे आहेत, अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा. अशा रीतीने तुम्हाला ज्या कंपनीचे संपादन करायचे आहे त्याचे योग्य मूल्यांकन करण्यास मदत मिळेल.

मार्गक्रमण

व्यवसाय हा कुठल्याही आर्थिक नियोजन आणि पाठबळाशिवाय होत नाही किंवा ते पैशाशिवाय शक्य नाही. त्यामुळे पैशाचा योग्य आणि विचारपूर्वक बंदोबस्त अनिवार्य आहे. धंद्याच्या सुरुवातीपासून पैशासंबंधी सर्व व्यवहार पद्धतशीर मांडता येणे अनिवार्य आहे. वेगवेगळे कर, करार आणि आर्थिक व्यवहार या सर्व गोष्टी कागदोपत्री नमूद असणे गरजेचे आहे.

कंपनीच्या सुरुवातीला कमी आणि आवश्यक भांडवलच वापरा. पैसे मिळत आहेत म्हणून व्यवसायाला ते जोडू नका. पैशाची हेळसांड करू नका, कारण जितके घेतले आहेत त्याहून अधिक किंवा तेवढे तरी परत करायचे आहेत हे विसरू नका. आपली कंपनी ही आपलीच राहिली पाहिजे या गोष्टीकडे लक्ष्य करून पुढे मार्गस्थ व्हा.

– सुजाता नाईकुडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?