तुम्हाला एक यशस्वी व्यक्ती म्हणून नावारूपाला यायचे असेल, तर ’वेळेचे नियोजन’ हीच तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली आहे. उद्योजकाला तर वेळेच्या नियोजनाच्या बाबतीत खूपच काटेकोर राहणे गरजेचे आहे.
उद्योजक हा स्वत:च स्वत:चा मालक असतो, त्यामुळे जर का तो स्वत: शिस्तबद्ध नसेल, तर याचे परिणाम त्याच्या व्यवसायावर होतात. त्याने स्वत:मध्ये संघटित होण्याची पहिली पायरी वेळेचे नियोजन ही आहे.
१. अनुशासित व्हा
अनुशासन म्हणजेच आपल्याला शिस्त लावण्यासाठी कोणीतरी दुसरा आपल्यामागे छडी घेऊन न बसता आपणच स्वत: आपल्याला शिस्त लावतो. त्यामुळे उद्योजक हा वेळ आणि हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याच्या बाबतीत कायम अनुशासित असावा.
आपल्याकडून एखादी गोष्ट पूर्ण करून घेण्यासाठी जर आपल्याला दुसर्या कोणाची तरी गरज लागत असेल, तर आपल्यात आणि सामान्य नोकरदारात काहीच फरक नाही. सामान्यपणे उद्योजकाला स्वत:चा बॉस म्हटले जाते. जर खर्या अर्थाने तुम्ही बॉस असाल तर तुम्हाला अनुशासित हे व्हावेच लागेल.
प्रत्येकाच्या जीवनात व्यावसायिक आणि वैयक्तिक असे दोन भाग असतात. उद्योजक स्वत:च स्वत:चा मालक असल्यामुळे अनेकदा त्याच्याकडून या दोन्हींमध्ये फार गफलत होताना दिसते. इथे नितांत आवश्यकता असते ती त्याच्यामधील अनुशासनाची.
दिवसातील २४ तासांपैकी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाला किती आणि कसा वेळ द्यायचा हे त्याने ठरवणे आणि मग त्यावर ठाम राहणे गरजेचे असते. अन्यथा त्याच्या दोन्ही गोष्टी विस्कळीत होऊ शकतात.
२. कामांच्या नोंदी करा
प्रथम आपल्याकडे असलेल्या, अपूर्ण राहिलेल्या प्रत्येक छोट्यात छोट्या कामांच्या नोंदी करा. अगदी पेनाची रिफील बदलण्यापासून ते फोनचे बिल भरण्यापर्यंत. या कामांमध्ये व्यावसायिक आणि वैयक्तिक अशी दोन वर्गीकरणं करा. मग या कामांमध्ये त्याने तातडीने पूर्ण करायची आहेत, अशा कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.
आज पूर्ण करण्याची कामांची यादी, या आठवड्यात करण्याची यादी, महिन्यात करण्याची. अशाप्रकारे सर्व उरलेली कामे कधी पूर्ण करायचीत याचे नियोजन करावेत आणि त्याचे काटेकोरपणे पालन करावे.
३. अनियोजित कामांना वेळ द्या
तुमचे दिवसभराचे सर्व कामांचे नियोजन झाले आणि एखादे काम जर मध्येच आले आणि ते करणे अनिवार्य असेल तर तुमचे दिवसभाराचे नियोजन कोलमडेल. त्यामुळे अशाप्रकारे अवेळी येणार्या अनियोजित कामांसाठीपण वेळ राखीव ठेवा. त्यामुळे अशा अनियोजित कामांमुळे तुमचे वेळेचे नियोजन बिघडणार नाही.
४. विनाउपयोगी गोष्टी टाळा
जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण करायच्या राहून गेलेलो असतो. कारण एक माणूस आयुष्यात सर्व काही करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे हे ठरवून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करणार आहात, हे निश्चित करा.
एकदा हे निश्चित झाले का त्याव्यतिरिक्त येणार्या अनेक गोष्टी या तुमच्या प्राधान्यक्रमात आपोआप मागे जाऊ लागतात. याशिवाय काही गोष्टी अशा असतात की अगदी तुम्ही नाही म्हणू शकला नाहीत म्हणून तुम्हाला कराव्या लागतात. अशा गोष्टींना ठरवून नाही म्हणायला शिका.
५. स्वत:वर लक्ष ठेवा
वर जे सर्व सांगितलं आहे, ते एकदा तुम्ही करायचे ठरवलेत का ते होते आहे की नाही यावर स्वत: लक्ष ठेवा. तुम्ही जे ठरवता प्रथम ते कागदावर उतरवा. म्हणजे कॉम्प्युटर, नोटपॅड, लॅपटॉप, स्मार्ट फोन असे कितीही आधुनिक गॅजेट्स वापरत असाल, पण तुमच्या वेळेचे नियोजन हे कागदावर म्हणजे वहीत अथवा डायरीमध्ये करा.
शास्त्रीयदृष्ट्या कागदावर लिहिलेले मनावर, बुद्धीवर कोरले जाते. पूर्ण झालेल्या कामांवर टिक करा म्हणजे उरलेली कामे लक्षात येतील.
– टीम स्मार्ट उद्योजक