आपल्या देशात लौकिक शिक्षण याचं महत्त्व अलौकिक आहे. जो भरपूर शिकतो, उच्च पदाची नोकरी मिळवतो त्याला समाजात मानही मोठा मिळतो. या उलट ज्यांचं शिक्षण कमी असतं, नोकरी फारशी चांगली नसते, यांच्याकडे फार सन्मानाने पाहिलं जात नाही. थोड्याफार फरकाने ही प्रत्येक घरातली स्थिती आहे.
यामुळे काही ना काही कारणाने शिक्षण अर्धवट सोडलेले, कमी शिक्षण असलेले समाजात न्यूनगंडाने जगत असतात. Under graduate असणं किंवा ड्रॉपआऊट असणं हे सांगताना लोकांची नजर खाली जाते. ठराविक शिक्षण पूर्ण करता न येणं ही भूषणावह गोष्ट नाही; तशीच ती मागास वाटावं अशीही गोष्ट नाहीय.
नुसत्या पदवीला आता अर्थ नाही!
काही दशकांपूर्वीपर्यंत देशात सुशिक्षित पदवीधरांची संख्या ही उपलब्ध नोकर्यांच्या तुलनेत कमी होती म्हणून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाला नोकरी मिळत होती. आता पदवीधरांची संख्या ही उपलब्ध नोकर्यांपेक्षा खूप जास्त आहे, त्यामुळे तरुणांना नुसतं पदवीपर्यंत शिक्षण करूनही हवी तशी नोकरी मिळत नाही.
म्हणून हव्या असलेल्या नोकरीसाठी पदव्युत्तर शिक्षण घेण्याची गरज वाटू लागली. आता पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांची संख्याही खूप वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांच्यातही नोकरी पटकवायला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
अनेक खाजगी कंपन्या या शैक्षणिक पातळी पाहून उमेदवाराची निवड करतात, परंतु त्याला त्याच्या शैक्षणिक पातळीनुसार काम करायला मिळेलच असे नाहीय. बँकिंगचा अभ्यासक्रम करून आलेल्या उमेदवाराला अनेक वर्ष फक्त क्रेडिट कार्ड किंवा विमा विकावा लागतो. एकूणच तुमचे शिक्षण आणि नोकरी याचा ताळमेळ नाही.
अशा स्पर्धात्मक युगात उर फुटेपर्यंत धावणे प्रत्येकाला शक्य होत नाही. बरेच जण काही ना काही करणारे या स्पर्धेतून बाहेर पडतात. कोणी शिक्षणासाठी पुरेसा पैसा नाही म्हणून, तर कोणी घरातील अडचणीमुळे, तर कोणी आपल्याला ते जमत नसल्यामुळे अर्धवट शिक्षण सोडतात. ग्रामीण भागातून शहरात आलेल्या अनेकांवर तर इंग्रजीतून शिकवलेलं समजणं जड जातं म्हणून शिक्षणातून रस उडून जातो.
गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर कसे याल?
काही ना काही कारणारे अर्धवट शिक्षण राहिलेले कुठे हाउसकिपिंगची नोकरी स्विकारतात, तर कोणी ऑफिस बॉय होतं तर कोणी आणखी काही. पण एकूणच कमी पगार आणि जास्त अंगमेहनतीची काम ही मंडळी स्वीकारतात आणि यातूनच ते गरिबीच्या दुष्टचक्रात अडकतात.
या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला स्वतःच्या मनातील न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. नुसते लौकिक शिक्षणानेच सारे काही होते असे नाहीय. बहुतांश सुशिक्षितांचा उच्च शिक्षण घेण्याचा उद्देश हा चांगली नोकरी मिळवणं हा असतो. त्यामुळे अशा सुशिक्षित उमेदवारांना नोकर्या देण्याच काम तुम्ही करू शकता.
स्वयंरोजगाराचा मार्ग
तुमचे शिक्षण कमी म्हणून कमी पगाराच्या नोकरीवर जीवनाची संघर्षमय वाटचाल करत राहण्यापेक्षा स्वतःमधील कौशल्य ओळखा, त्यामध्ये अधिक शिक्षण घेऊन त्याला आपल्या उपजीविकेचं साधन बनवा. भारत सरकारच्या ‘स्कील इंडिया’चाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. ‘स्कील इंडिया’वर रजिस्टर होऊन अनुदानित प्रशिक्षण घेऊ शकता.
तुमच्यातल्या कौशल्याच्या आधारे तुम्ही एखादा छोटेखानी व्यवसाय सुरू करून लघुउद्योजक होऊ शकता. उद्योजक होण्यासाठी तुमच्यात उद्योजकता अंगी बाणायला हवी. यासाठी आम्ही (स्मार्ट उद्योजकने) उद्योजकतेचा मोफत ऑनलाईन कोर्सही उपलब्ध केला आहे. याद्वारे तुम्ही केव्हाही, कुठूनही उद्योजकतेचे धडे घेऊ शकता. याशिवाय तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील अनेक गोष्टी शिकाव्या लागतील. मार्केटिंग किंवा आपली विक्री वाढवून मोठे कसे व्हायचे हेही शिकावे लागेल.
गणित, विज्ञान याचा कंटाळा म्हणून शिक्षणापासून दूर गेलेले किती तरी लोकं आपल्या आवडीचं शिक्षण मिळालं की मन लावून शिकतात. इथे तुम्हालाही तुमच्या आवडीचे, तुमच्या क्षेत्रातील शिक्षण घेण्यात मजा येईल. अशाप्रकारे शिक्षण पूर्ण करू शकला नाहीत, याची खंत करत बसू नका. स्वत:चा व्यवसाय सुरू करून नोकरी मागणारे नाही, तर देणारे व्हा!
– शैलेश राजपूत