आपला व्यवसाय १०, १२, १५ वर्षांनंतरसुद्धा फायदेशीर असेल का?

कोणतीही गोष्ट दोन वेळा तयार होते. एकदा माणसाच्या विचारात आणि दुसऱ्यांदा अस्तित्वात. व्यवसायसुद्धा असाच असतो. तो पहिल्यांदा विचारात तयार व्हायला हवा. त्यानंतरच तो अस्तित्वात येईल. त्याकरता उद्योजकाने विचार अधिक प्रगल्भ आणि मोठा करायला हवा.

विचार प्रगल्भ म्हणजे नेमके काय करायचे?

व्यवसायात आपल्याला खूप जास्त अभ्यास करावा लागतो. धोरणात्मक नियोजन, योजना आणि प्रक्रिया, नियोजन अशा सर्व गोष्टीचा आपण अभ्यास करत असतो. हा अभ्यास आपण फक्त क्षणीक करतो. आज आपल्याला कशाची गरज आहे? आज काय आवश्यक आहे? आज कसे काम करता येईल? ह्यामुळे आजचे काम जरी सोईस्कर झाले, तरी ह्याचे व्यवसायातील दूरगामी परिणाम चांगले असतीलच असे नाही.

वैचारिक प्रगल्भतेत दूरगामी विचार करणे आवश्यक आहेत. माझा व्यवसाय मला १०, १२ किंव १५ वर्षांनंतरसुद्धा कसा फायदेशीर असेल, ह्याचेसुद्धा प्रयोजन आजच्या व्यावसायिक नियोजनात करावे लागेल. व्यावसायिकाला स्वत:मध्ये काही व्यावसायिक वर्तणुक वैशिष्ट्ये जोपासणे आवश्यक आहेत.

उत्कटता बाळगा :

उत्कटता (passionate) बाळगणे म्हणजे काय? उत्कटता सर्वकाही आहे. आपल्या उत्कटतेचे अनुसरण करणे, हे सर्व उद्योजकांना भेडसावणाऱ्या  अडचणींवर मात करण्याचे रहस्य आहे. यशस्वी संप्रेषणामध्येदेखील हा एक आवश्यक घटक आहे. आपण आपल्या कल्पनांमध्ये उत्कट नसल्यास, इतर कोणीही असणार नाही.

काही लोकांना स्वत:च्या व्यवसायाबद्दल भूप जास्त उत्सुकता दिसून येत नाही. त्यामुळे काही नवीन वा नाविन्यपूर्ण पद्धती दिसून येत नाही. ज्याला उद्योजक व्हायचे आहे, त्याने असा विचार करून चालनार नाही. आपल्या व्यवसायाबद्दल उत्सुकता असलीच पाहिजे. “हे मी करणारच” हा दृष्टिकोन असणे आवश्यक आहे.

संधी आणि आव्हाने ओळखावी :

‘प्रत्येक आव्हानात एक संधी असते’, असे म्हणतात. उद्योजकाला संधी आणि आव्हान ह्यातील फरक ओळखता आला पाहिजे. संधी साधणे म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक असते. आव्हान हे फक्त दायित्व. यामुळे आव्हानांमधील संधी आणि संधील आव्हाने ह्याचा ताळमेळ बसवता आला पाहिजे.

इतरांचा सल्ला स्वीकारा :

जे कोणी व्यावसायिक सल्लागार आहेत त्यांचे विचार ऐका आपले अडचणी सांगा, मोठ्या मानाने चुका स्वीकारा आणि व्यवसायात दुरुस्ती करण्यास किंवा नव्याने सुरुवात करायला तयार राहा. प्रत्येकाने दिलेला सल्ला हा फायदेशीर असेलच असे नाही, पण नसेलही असेही नाही त्याचा सल्ला म्हणून स्वीकार करा आणि पूर्ण विचारांती व्यावसायिक पुष्टीकारणानंतरच धोरण म्हणून निवडा.

आत्ममंथन करा :

व्यवसाय सुरू केल्यापासून आजपर्यंत कोणत्या चांगल्या गोष्टी आपण केल्या कोणती फायदेशीर धोरणे आपण राबवली, त्याचा काय फायदा झाला. त्याउलट आपण काय चुका केल्या, कोणती धोरणे नुकसानदायी होती. काही गोष्टी ह्या व्यवसायास खूप आवश्यक आहेत, पण आपल्या जवळ ते नाही आहे अशा गोष्टीची यादी तयार करा. सर्व बाजूने विचार करा. आत्ममंथन करणारे उद्योजक संकटाच्या किंवा कठीण परिस्थितीतसुद्धा सकारात्मक आणि आशावादी प्रकाशात गोष्टी पाहतात.

स्वत: अभ्यास  करा :

“असाध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास तुका म्हणे” तुकाराम महाराजांनी केलीली अभ्यासाची व्याख्या. उद्योजक हा नेहमीकरता विद्यार्थी असावा. प्रत्येक व्यवहाराचा त्याला अभ्यास करता आला पाहिजे. खूप कमी व्यवसायिक नियमित अभ्यास करतात अभ्यास करणे म्हणजे MBA किंवा बिझनेस प्रोसेस शिकणे असे नाही अथवा कोणती शैक्षणिक पदवी घेणे असे नाही. व्यावसायिक अभ्यास म्हणजे आपल्याला आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवाचे विश्लेषण करून आणखीन चांगली कामगिरी करणे.

ह्या सर्व प्रगल्भतेचे उत्तम उदाहरण म्हणजे जमशेदजी टाटा

जमशेदजी टाटांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. १८७७ साली ‘एम्प्रेस मिल’चा एक मालक एवढा मोठा विचार करतो तोही एकोणिसाव्या शतकात.

त्यांनी १९०१ मध्ये युरोप आणि अमेरिकेची यात्रा केली, जेणेकरून पोलाद व्यवसायाचे शिक्षण घेता येईल. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताज हॉटेलचे उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते. तेही एक छोटे मोठे व्यावसायिकच होते. मेहनत आणि वैचारिक प्रगल्भतेने “टाटा” हे नाव मोठे झाले.

मूळ व्यावसायिक संकल्पना, तत्रंज्ञान, संघटनात्मक रचना, उत्पादनाचे ज्ञान/वितरण आणि व्यवसायिक विचारधारा ह्या सर्व गोष्टी तयार करताना एका उद्योजकाला मोठा आणि चांगला विचार करणे आवश्यक आहे. मूळ व्यावसायिक संकल्पनेक आपण आता रूढीवादी किंवा जुनाट विचार करून चालणार त्याकरता आपल्याला नवीन नवीन कल्पना वा युक्त्या करून व्यवसाय वाढवणे आहे.

झपाट्याने वाढणारे तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला व्यवसायात करावाच लागेल; जसे इंटरनेट, प्रोडक्शन मशीन, मेलिंग सिस्टिम्स, CRMs आणि बरेच नवीन नवीन तंत्रज्ञान आहेत, ज्याद्वारे आपला व्यवसाय आपण सोईस्कररीत्या कमी वेळेत आणि कमी खर्चात करू शकतो. ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर योग्य त्या ठिकाणी आणि योग्य असा केला तर निश्चितच फायदा होईल.

आपला व्यवसाय हा घटनात्मक आणि संघटित असावा

ग्राहक, पुरवठा करणारे आणि इतर व्यावसायिक भागीदार ह्याचे रचनात्मक पद्धतीने व्हायला हवे. ह्या सर्व भागीदाराची कार्ये, प्रतिबद्धता, गुंतवणूक, चर्चासत्र, प्रशिक्षण ह्या सर्व गोष्टीची एक रचना हवी, ती आपल्या सोईनुसार आपण ठरवू शकता, पण ती आपल्या विचारात स्पष्ट असावी. प्रशिक्षण आणि विकास, ग्राहक सेवा, माहिती वितरण, ह्यासर्व गोष्टीसुद्धा एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे होणे अपेक्षित आहेत.

आपण व्यवसाय करतोय, त्यामुळे व्यावसायिक विचारधारेतूनच ह्या गोष्टी घडायला हव्या. ह्यावर होणार खर्च, वेळ आणि मनुष्यबळ ह्याचा ताळमेळ लावावा आणि लगेचच ह्या प्रगल्भतेची सुरुवात करावी, काही त्रुटी आपल्यास त्यावर लगेच उपाय करावे किंवा बदल करावा ह्यातूनच एक संघटनात्मक आणि रचनात्मक व्यवसाय सुरू होईल.

यश-अपयश हे व्यवसायात असणारच त्यामुळे मन मोठे हे सर्व पचवाचे आणि पुन्हा: सुरुवात करायची. आपण व्यवसायाच्या अभूतपूर्व युगात प्रवेश केला आहे. जगातील आघाडीच्या व्यवसायातील आकडेवारी पूर्वीपेक्षा अधिक प्रचलित, दृश्यमान आणि प्रवेशयोग्य आहे.

विचार ही मनाची प्रतिकृती आणि कृती ही विचारांची प्रतिकृती आहे. त्यामुळे विचाराची प्रगल्भता असणे खूप आवश्यक आहे. ह्यातूनच नवीन संधी शोधता येईल.

मयूर देशपांडे
७७२१००५०५१
(लेखक व्यवसाय विश्लेषक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?