व्यवसायांमध्ये नेहमीच उधारी चालत असते. एका आडगावातल्या हॉटेलमध्ये एक पाहुणा आला. त्या गावात त्याचे फक्त एकच दिवसाचे काम होते. त्यामुळे तो हॉटेलमालकाला म्हणाला, “हे २००० ₹. अॅडव्हान्स म्हणून ठेवा. मला एका रात्रीपुरती खोली हवी आहे; पण जर माझे काम आजच झाले तर मात्र मी न राहता निघून जाईन. त्या वेळी मला माझे ₹ २००० परत द्या.”
हॉटेलमालक खुश झाला. त्याने नोकराला चांगली खोली तयार करून ठेवायला सांगितले आणि पाहुण्याला म्हणाला, “जाण्यापूर्वी नाष्टापाणी तरी करून जा.” पाहुण्याने नाष्टा केला त्याचे बिलपण दिले आणि कामाला निघून गेला.
हॉटेल मालकाने ताबडतोब आपल्या नोकराला बोलावले. त्याच्याकडे ₹ २००० दिले आणि म्हणाला, “आताच्या आता त्या बेकरीवाल्याची उधारी फेडून टाक.” नोकराने धावत जाऊन बेकरीवाल्याची ₹ २००० ची उधारी फेडून टाकली आणि ताजे पावही घेऊन आला. बेकरीवाल्याला ₹ २००० एकरकमी मिळाल्याने आपल्या मुलाबरोबर त्याच्या वाण्याकडे पाठवले, कारण किराणा मालाची मैद्याची ₹ २००० ची उधारी होती, ती फेडून टाकली.
वाण्याने त्याच्या नोकराचा थकलेला ₹ २००० चा पगार ताबडतोब देऊन टाकला. नोकर जेवायला घरी गेला तेव्हा त्याने त्याच्या बायकोकडे ते ₹ २००० दिले. त्याची बायको त्या हॉटेलमध्येच काम करीत होती आणि नवर्याचा पगार न झाल्याने तिने त्या हॉटेलमालकाकडून ₹२००० आगाऊ घेतले होते. त्यामुळे त्याच्या बायकोनेही तत्परतेने त्या हॉटेलमालकाचे ₹२००० परत करून त्या ओझ्यामधून ती सुटली.
संध्याकाळी तो पाहुणा काम आटोपून परत आला. त्याचे काम झाले असल्याने त्याला आता खोलीची गरज नव्हती. त्यामुळे त्याने हॉटेलमालकाकडून अॅडव्हान्स दिलेली रक्कम ₹२००० परत घेतली. एकूण त्या गावात बाहेरून एक रुपयाही न येता एकूण ८००० रुपयांची उधारी फेडली गेली होती.
– शशिकांत काळे
डहाणू रोड – ४०१६०२