निर्यात व्यवसायातील स्पर्धात्मकता

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. उपलब्ध प्रत्येकच क्षेत्रात संबंधितांना आज तीव्र अशा स्पर्धेला सामोरे जावे लागते; व्यावसायिक क्षेत्रही त्यास अजिबात अपवाद नाही. देशांतर्गत व्यवसायाच्या तुलनेत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने बघता चित्र काहीसे आशादायक आहे, असे म्हणावयास हरकत नाही; म्हणजे जागतिक व्यापारात ‘स्पर्धा नाही’ असे म्हणणे अगदीच अतिशयोक्ती होईल.

आज संपूर्ण जगाची एकूण लोकसंख्या ७०० कोटी असून आपल्या भारत देशाची लोकसंख्या १३० कोटीच्या आसपास आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दात मांडायचे तर, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १७ टक्के जनता ही भारतात स्थायिक असून तब्बल ८३ टक्के जनता भारताबाहेर स्थित आहे.

हे गणित येथे मांडायचे कारण हेच की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा एकंदरीत आवाका फारच मोठा आहे आणि स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने बघता ही बाब फारच सुखावह आहे. एकंदर बाजारपेठेचे आकारमान हे फारच अवाढव्य असल्याने स्पर्धा असली तरी तिची तीव्रता अगदीच कमी आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यावसायिक स्पर्धा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ नैसर्गिकरित्या अत्यंत स्पर्धात्मक आहे; त्यामुळे निर्यातदार हा थेट स्पर्धेस सामोरा जातो तो प्रथम त्या देशाच्या स्थानिक बाजारपेठेला, दुसरे म्हणजे इतर देशांच्या निर्यातदारांकडून, तिसरे त्यांच्या स्वत:च्या देशाच्या सहयोगी निर्यातदारांकडून.

निर्यातदाराने सर्वप्रथम स्वत:च्या देशाच्या शेजारील राष्ट्रांना निर्यात करण्यास अधिक प्राधान्य द्यावे. कदाचित उत्पादनपरत्वे शेजारच्या देशांशी व्यवहार करताना तेथे अधिक प्रतिस्पर्धी असू शकतात, परंतु दोन्ही देशांमधील अंतर भौगोलिक दृष्ट्या कमी असल्याने व्यवहार हा केव्हाही अधिक फायदेशीर ठरतो आणि निर्यातदाराच्याही व्यवसायाला तुलनेने लवकर चालना मिळते. दूरवरच्या एखाद्या देशात अथवा एखाद्या दुर्गम देशांमध्ये निर्यात करणे सुरूवातीस फायद्याचे वाटू शकते कारण तेथे व्यावसायिक स्पर्धा अतिशय कमी असते.

व्यापार आणि गुंतवणूकीचे मानदंड हे अनेकविध देश आणि तेथील देशांतर्गत बाजारपेठेत प्रवेश करण्यास उत्सुक परदेशी कंपन्या आणि तत्संदर्भात असलेली सरकारी धोरणे यावर सर्वस्वी अवलंबून आहे, त्याचमुळे आधीच असलेल्या स्पर्धेत नैसर्गिकरित्या प्रचंड वाढ होते आणि याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम तेथील जागतिक व्यापारावर होतो.

वरील सर्व मुद्दे जरी ग्राह्य धरले तरी बाजारपेठेचा आवाका बघता उत्पादन / सेवा परत्वे असलेल्या एकंदरीत स्पर्धेचे प्रमाण देशांतर्गत व्यापारतील जीवघेण्या स्पर्धेपेक्षा अगदीच नगण्य आहे; याला मुख्य कारण आहे उद्योजकांमध्ये निर्यातीबाबत असलेले अज्ञान तसेच त्यायोगे येणारी उदासीनता.

एखाद्या विवक्षित उत्पादन / सेवा क्षेत्रात उत्पादनक्षमता अधिक असूनही संबंधित व्यावसायिक हे देशांतर्गत व्यापारास प्राधान्य देत असल्याने निर्यातीकरिता स्पर्धा उरत नाही. त्याचमुळे आपल्या भारताची एकूण निर्यात टक्केवारी आजमितीला फक्त आणि फक्त १.६७% एवढीच आहे; हेही येथे नमूद करणे करजेचे आहे.

ही प्रस्थापित आणि होतकरू व्यवसायिकांसाठी स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने समाधानाची बाब असली तरीही एकंदरीत देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने तितकीच खेदाची बाब आहे. निर्यातीचा टक्का वाढणे ही सध्या देशाची गरज आहे.

त्यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी त्यांच्या देशांतर्गत व्यापाराबरोबरच निर्यातीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यातून जरी स्पर्धात्मकता वाढीस लागत असेल तरी ती देशांतर्गत व्यापारातील जीवघेण्या स्पर्धेपेक्षा निश्चित कमी असेल. केव्हाही व्यावसायिक स्पर्धा ही एकंदर सर्वच घटकांच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

यशस्वी निर्यातदार हे नेहमी व्यावसायिक स्पर्धेचे स्वागत करूनच यश संपादन करतात. कारण स्पर्धेमुळेच उत्पादनाची गुणवत्ता व बाजारमूल्य योग्य राहू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही प्रचंड मोठी आहे तेव्हा निर्यातदार सर्वात कमी स्पर्धा असणार्‍या देशांमध्ये निर्यात करून आपल्या व्यवसायाची वाढ सहज करू शकतात. तेव्हा स्पर्धेची फारशी तमा न बाळगता धीरोदात्तपणे जगभर व्यवसाय करा.

– सौरभ दर्शने
निर्यातदार व विदेश व्यापार सल्लागार, मुंबई
संपर्क : ८१०४०५५४८९

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?