₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ब्रिटीश अख्ख्या जगाला भ्रमंती घालून भारतात आले ते भारतापोटी असलेल्या प्रेमापोटी नव्हे, तर व्यापारासाठी. व्यापारामध्ये सर्वाधिक महत्त्व आहे ते दळणवळणाला. तुर्कीमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे युरोपीयांना जमिनीवाटे भारतात व्यापारासाठी येण्याचा मार्ग बंद झाला. म्हणून वास्को द गामाने सात समुद पार करून समुद्रावाटे भारताचा शोध लावला.
आजही व्यापारामध्ये दळणवळणालाच सर्वाधिक महत्त्व आहे. अमेरिकेतील बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी ‘अॅमेझॉन’ ही भारताच्या प्रत्येक शहरापर्यंत येऊन पोहोचली आहे, पण अजूनही ग्रामीण भागात तिला प्रवेश करता येऊ शकला नाहीय याचे कारण हेच आहे की दळणवळणातील अडचणी.
भारतीय पोस्ट खाते सोडून कोणालाच अद्याप ग्रामीण भागात दळणवळणाचे जाळे उभे करता आले नाहीय. आजच्या स्टार्टअपच्या जमान्यात हीच मोठी संधी आहे आणि ग्रामीण तरुणाने याकडे डोळसपणे पाहून तिचा लाभ घेतला पाहिजे.
आज विविध क्षेत्रात स्टार्टअप्स उभे राहत आहेत. यामध्ये ई-कॉमर्स स्टार्टअप्सचा भरणा सर्वाधिक आहे. ग्रामीण तरुणांनी लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट या क्षेत्रात उतरण्याची गरज आहे. आजच्या ई-कॉमर्सच्या युगात जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यातून कोणतीही वस्तू भारतातील छोट्या-मोठ्या शहरापर्यंत येऊ शकते, पण तिथून पुढे गावात येऊ शकत नाही, कारण या वस्तू गावागावांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम सुविधा उपलब्ध नाही.
तालुका पातळीवरील लॉजिस्टिक स्टार्टअप
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण ३५५ तालुके आणि ४३,६६५ गावं आहेत. म्हणजे प्रत्येक तालुक्यात सरासरी १२३ गावे येतात. फक्त एका तालुक्याला लॉजिस्टिक सुविधा पुरवणारे स्टार्टअप सुरू केले तर महाराष्ट्रात असे किमान ३५० ते ४०० स्टार्टअप्स उभे राहू शकतील.
प्रत्येक स्टार्टअप प्रत्येकी किमान २०० तरुणांना रोजगार उपलब्ध करून देश शकेल. म्हणजे एकीकडे महाराष्ट्रात लॉजिस्टिकची समस्या पूर्णपणे सुटून आपले राज्य संपूर्ण जगाशी जोडले जाऊ शकेल आणि यातून किमान ८० हजार ते १ लाख तरुणांना नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
यामध्ये दोन प्रकारच्या उद्योगसंधी उपलब्ध आहेत. एक म्हणजे तुम्ही स्वत:ची लॉजिस्टिक कंपनी सुरू करू शकता किंवा इतर कुरियर आणि लॉजिस्टिक कंपन्यांच्या फ्रँचायझी घेऊन स्थानिक स्तरावर काम करू शकता. स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्यात जास्त मेहनत घ्यावी लागेल, मात्र यात मोठे होण्याची संधी जास्त आहे.
स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्याची प्रक्रिया
१. तुमच्या कंपनीचा प्रकार म्हणजे एकल मालकी, भागीदारी, प्रायव्हेट लिमिटेड, इत्यादी ठरवून त्यानुसार कंपनी स्थापन करा.
२. तुमच्या तालुक्यात जितकी गावे आहेत, त्या प्रत्येक गावात किमान एक ते दोन आपले प्रतिनिधी नेमा. तालुक्याच्या ठिकाणी जिथे तुमचे मुख्य केंद्र स्थापन करा.
३. सर्व मोठ्या ई-कॉमर्स व लॉजिस्टिक कंपन्यांना संपर्क साधून तुमच्या तालुक्यातील जितक्या पिनकोडला तुम्ही सेवा पुरवणार आहात, त्या पिनकोडमध्ये दळणवळणाची जबाबदारी घ्या.
४. विविध कंपन्यांशी तुमचे करार झाल्यावर त्यांच्याकडून येणार्या मालाचे गावांनुसार, पिनकोडनुसार विभागणी करा.
५. आपल्या विविध गावांतील प्रतिनिधींना दिवसातून किमान एकदा मुख्य केंद्रात यायला सांगा आणि त्यावेळी त्यांच्याकडे त्यांनी जबाबदारी घेतलेल्या गावांचा, पिनकोडचा माल सुपूर्त करा.
६. तुमचे प्रतिनिधी आपआपल्या गावांमध्ये दिवसभरात ज्यांच्या ज्यांच्या नावे वस्तू आल्या आहेत, त्यांना त्या पोहोचवून त्यांच्याकडून सामान मिळाल्याच्या पावत्यांवर सह्या घेतील.
७. त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसर्या दिवशी तुमच्या प्रतिनिधींकडून तुम्ही सामान पोहोचवल्याच्या सह्यांसहित असलेल्या पावत्या गोळा कराल.
८. या व्यवसायात माहिती-तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. उदा. समजा मुंबईच्या एका माणसाने डी.टी.डी.सी. कुरिअरने कोल्हापूरमधील भुदरगड तालुक्यातील एका गावात पाठवण्यासाठी एक पार्सल पाठवले. डी.टी.डी.सी. कुरिअरची सेवा भुदरगडपर्यंत असेल तर तिथून पुढे ते तुम्हाला ते पार्सल सुपूर्त करतील.
तिथून पुढे तुमचा माणूस ते गावातील दुसर्या माणसापर्यंत ते पार्सल पोहोचवून त्याच्याकडून पावतीवर सही घेऊन ती तुम्हाला देईल. तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये सामान पोहोचल्याची नोंद करून सही असलेली पावती स्कॅन करून सॉफ्टवेअरमध्ये अपलोड कराल. साधारणत: दोन ते तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
९. या व्यवसायात विश्वासार्हता आणि खात्रीशीर माणसे असणे गरजेचे आहे. कारण ग्राहकाकडून येणारे सामान मौल्यवानही असू शकते.
१०. सायकल व नागरी वाहतुक सुविधांचा वापर अधिक केल्यास खर्च कमी होऊन नफा वाढवता येऊ शकेल.
– शैलेश राजपूत