रस्ता कितीही कठीण असला, खाचखळग्यांनी भरलेला असला तरीही आपल्या कष्टाने त्यावर मात करणारा माणूस यशस्वी होतो. एक उद्योगी आणि यशस्वी असे व्यक्तिमत्त्व म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. प्रणय खुणे. जिद्द, कष्ट आणि संयमाने सामाजिक बांधिलकी जपत खुणेसरांनी तरुणांपुढे एक आदर्श घालून दिला आहे.
गडचिरोली हा महाराष्ट्रातील अतिदुर्गम जिल्हा. गडचिरोली म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते चित्र म्हणजे; दळणवळणाचे हाल असलेला आदिवासीबहुल पट्टा. सतत होणार्या नक्षली कारवायांमुळे अतिसंवेदनशील असा हा भाग. अशा सतत अस्थिर वातावरणात यशस्वी व्यवसाय उभारणे अवघड, पण डॉ. प्रणय खुणे यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलेले.
आज करोडोंची उलाढाल असलेली ‘खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी’ त्यांनी स्थापन केली, शिवाय सामाजिक बांधिलकी जपत गडचिरोली जिल्ह्यात व्यवसाय, उद्योग वाढावेत, लोकांना रोजगार मिळावा यासाठी ते अविरत काम करत आहेत.
डॉ. प्रणय खुणे हे कुरखेडा तालुक्यातील गुरनोली गावचे. अतिदुर्गम भागातून आलेल्या प्रणय यांनी आपल्या करियरची सुरुवात ग्रामसचिव म्हणून केली. घरातून कामासाठी बाहेर पडताना त्यांच्या आईने त्यांना एक लोखंडी पेटी दिली होती. या पेटीत ताट, वाटी, ग्लास आणि एक चादर होती. या पुंजीवर त्यांचा प्रवास सुरू झाला.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)आज अपार कष्टाने कन्स्ट्रक्शन उद्योगात स्वतःच्या मालकीचे ५० ट्रक, १०० मशीनरी आहेत. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात कोटींचे साम्राज्य त्यांनी उभारले आहे. हा संपूर्ण प्रवास बोलका आणि खूप काही शिकवणारा आहे.
डॉ. प्रणय खुणे हे ग्रामसचिव म्हणून काम करताना अनेक गावांशी जोडले गेले. अतिसंवेदशील ग्रामपंचायती, गाव यांचा आपल्या वीस वर्षांच्या काळात त्यांनी कायापालट केला. लोकांना मूलभूत सोईसुविधा, रस्ते, पाणी मिळावे यासाठी काम केले. शासनाच्या विविध योजना अतिदुर्गम भागापर्यंत पोहचवल्या. वेगवेगळी आणि मोठमोठी विकासाची कामे लोकांपर्यंत नेली.
वीस वर्षांचा काळ तसा पाहता खूप मोठा काळ आहे ज्यामध्ये ग्रामसचिव म्हणून काम करताना सामाजिक बांधिलकीतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास, सुविधा पोहचवण्याचे काम ते करत राहिले.
पुढे नोकरी सोडली आणि स्वत:चा ‘खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी’ नावाने त्यांनी कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू केला. आज गडचिरोली जिल्ह्यात जवळपास पाचशे किलोमीटरचे रस्ते ‘खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी’ने बांधले आहेत. घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षली भाग अगदी माणूस पोहचू शकत नाही त्या त्या भागात रस्तेबांधणी केली आणि रस्त्याचे जाळे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचवले.
अतिदुर्गम, अतिसंवेदनशील असला तरी गडचिरोली जिल्हा हा निसर्गसंपन्न असा जिल्हा आहे. निसर्गाने भरभरून अनेक गोष्टी इथे दिल्या आहेत. निसर्गाचा वरदहस्त असलेल्या या जिल्ह्यात निसर्गाशी जोडलेल्या अनेक उद्योगसंधीना इथे वाव आहे. सगळ्यात मोठी संधी पर्यटन उद्योगाला आहे.
खरे तर या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषित करावा यासाठी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे. अनेक निसर्गरम्य ठिकाणे इथे आहेत जी दुर्लक्षित आहेत. ज्याचा विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही आहेत. तर काही ठिकाणी राज्य शासनाकडून जवळपास ५० ठिकाणांना ‘क’ वर्ग गटाचा दर्जा दिलेला आहे.

जर या ठिकाणांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला तर अनेक रोजगारसंधी इथे निर्माण होतील. डॉ. प्रणय खुणे म्हणतात, याशिवाय अनेक बचतगट इथे आहेत, पण हवे तसे रोजगार इथे केले जात नाहीत त्यामुळे आम्ही त्यावरही काम करतोय.
शासन लघुउद्योगांसाठी काही मदत करू शकेल यासाठी सूचना, प्रस्ताव यावर ते काम करतायत. प्रत्येक गावात रोजगार कसा निर्माण करता येईल यावर त्यांचा भर आहे. तसेच गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणत बांबू उपलब्ध आहे. बांबूपासून वस्तू, खेळणी, सजावटीची साधने या प्रकारचे उद्योग गडचिरोली जिल्ह्यात उभारले जाऊ शकतात.
इथे बांबूसंबंधित व्यवसायांना चांगला वाव आहे, पण याबाबत जागरूकता नाही. काय करावे हे लोकांना कळत नाही. मग अशा वेळी शासनाने स्किल डेव्हलपमेंट सेंटर इथे मोठ्या प्रमाणवर सुरू करायला हवेत. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना अगरबत्ती उद्योग, बांबू हस्तकला असे अनेक प्रकल्प उभारता येतील. यासाठी शासन दरबारी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
खुणे सांगतात, आम्ही आमच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना प्लायवूड उद्योग सुरू करावेत यासाठी आवाहन करत आहोत. प्लायवूड उद्योगाला इथे चांगला वाव आहे. याचसोबत इथे मोठ्या प्रमाणात ‘मोहा’ आहे. मग मोहावर आधारित मोठ्या प्रमाणात उद्योग कसा उभारता येईल यासाठीही प्रयत्न चालू आहेत.
राज्य शासनाकडे यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. यासाठी आम्ही एक हेल्पलाईनसुद्धा सुरू करतोय. जेणेकरून छोट्या उद्योगांना येणार्या अडचणी, समस्या सोडवायला मदत करता येईल. कोणाला उद्योगासाठी कर्ज घेताना अडचण येते, कर्ज प्रस्ताव कसा करावा कळत नसते, प्रकल्प बनवायला मदत हवी असते तर त्यासाठी त्यांची टीम लोकांना मदत करते आहे.
डॉ. प्रणय खुणे हे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनसुद्धा काम पाहतात. या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत ते पोहचतायत. जेथे मानवी अधिकार पायमल्ली तुडवले जातात, ते प्रश्न या संघटनेमार्फत राज्य शासनासमोर ठेवले जातात.
वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी चेन्नई यांनी प्रणय खुणे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केलीय. याशिवाय ‘लोकमत लोकनायक’ या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
क्षेत्र कोणतेही असो उद्योग, राजकीय वा सामाजिक या प्रत्येक क्षेत्रात प्रणय खुणे सरांनी आपला कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. गडचिरोलीसारख्या साधनसंपत्ती कमी असलेल्या ठिकाणी व्यवसाय केवळ सुरू करून ते थांबले नाहीत तर स्वत:च्या उद्योगाला यशाच्या शिखरावर पोहचवले. सोबत इतरांनाही आपल्यासोबत विकासाच्या व भरभराटीच्या वाटेवर नेण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत.
संपर्क – 98349 24055
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.