स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांच्या राहणीमानात फरक झाला आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळात घरगडी फाटके कपडे घालत व शिळे अन्न खात. आता तेच टेरलीनचे कपडे घालतात, प्रीमियर शोचे काळ्या बाजारात तिकीट घेतात व प्रसंगी हॉटेलात जेवतात.
वर सांगितलेल्या फ्रिज, गीझर, टी.व्ही. इत्यादी सुविधा आज केवळ श्रीमंतांकडेच असतात असं नाही, तर मध्यमवर्गीय व कामगार वर्गाकडेही असतात आणि ते वापरणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असते; परंतु त्यांना आवश्यक असणार्या सेवा एका छत्राखाली मिळत नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रिकचं काम करण्यासाठी एकीकडे, फ्रिज दुरुस्त करण्यासाठी दुसरीकडे, तर टीव्ही दुरुस्त करण्यासाठी तिसरीकडे अशी लोकांची धावपळ होते. तेव्हा ही पोकळी तुम्ही भरून काढायची.
यासाठी तुमच्याकडे मोबाइल असणे आवश्यक आहे. तो नसल्यास त्याची कुठे तरी सोय पाहिजे अथवा एखादा दुकानदार उदाहरणार्थ टेलर, लाँड्रीवाला तुमच्या ओळखीचा पाहिजे, ज्याच्याकडे लोक (म्हणजे तुमचे गिर्हाईक) निरोप देऊ शकतील. हे सेवा देणारे (प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे) फारसे शिकलेले नसतात व गिर्हाईकाशी कसं वागावं हे त्यांना समजत नाही. तेव्हा गिर्हाईकाशी तुम्ही बोलायचं.
हे कारागीर बहुतेक कुठे ना कुठे नोकरीला असतात. तेव्हा फावल्या वेळेत ते तुमच्यासाठी काम करतील. होणारा नफा तुम्ही व तो कारागीर यांनी वाटून घ्यायचा.
एकदा एका प्रकारची सेवा (उदाहरणार्थ टीव्हीची दुरुस्ती) तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे दिलीत व गिर्हाईकाचा विश्वास संपादन केलात, की गिर्हाईक इतर सेवांसाठीही तुमच्याकडे येईल व आपल्या चार मित्रांकडे तुमची शिफारस करेल. यासाठी टेलिफोन वा संपर्काची सोय, कारागिरांशी चांगले संबंध व त्यांना योग्य प्रकारे हाताळण्याची हातोटी व संभाषणचातुर्य एवढे भांडवल पुरेसे आहे. पैशाची फारशी गरज नाही. हा धंदा आपल्या कर्तबगारीवर तुम्ही कितीही वाढवू शकता.
मध्यमवर्गीय आणि खास करून मध्यम वयाच्या स्त्रिया व पुरुष ज्यांची घर सांभाळणे ही प्राथमिकता असते; परंतु ज्यांना काही तास फावला वेळ मिळतो त्यांना हा उद्योग करणे सहज शक्य आहे.
– टीम स्मार्ट उद्योजक