कोरोना, लॉकडाउन या काळात काही मराठी नवउद्योजक निर्माण झाले. त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेक पोस्टही लिहिल्या गेल्या, viral केल्या गेल्या. मराठी माणूस नोकरीच्या मागे न धावता आता धंद्यात उतरू लागला आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे, पण या सगळ्या नवोदित धंदेवाईकांचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की यातले बहुतांश धंदे हे कमी अभ्यास आणि दीर्घकालीन योजनेच्या अभावाने सुरू केले आहेत.
कोणी कलाकार मासे विकतंय तर कोणी graduate वडे-भजी तळतंय, कोणी आजी भाजी विकतेय, तर कोणी तयार अन्नपदार्थ. एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या perishable म्हणजे लवकर नाश होणाऱ्या गोष्टी आहेत. अशा perishable गोष्टींचा व्यापार करताना अभ्यास आणि पर्यायी विक्रीची तरतूद केलेली असणं जास्त गरजेचं आहे. नाही तर चार दिवसांत जी कमाई कराल, ती एका दिवसातल्या नुकसानीत धुतली जाईल. शिवाय असे धंदे करणारे आधीच खूप लोक बाजारात आहेत.
लॉकडाउनमुळे त्यांनी गाशा गुंडाळला म्हणून तुम्ही ती जागा घेतलेली नाही, तर तुमची नोकरी गेली, धंदा बसला म्हणून तुम्ही तिथे आला आहात. त्यामुळे तुमचा जो स्पर्धक आहे तो अनुभवी आहे, त्याला या धंद्यातले खाचखळगे माहीत आहेत. त्यामुळे त्याचा धंदा तुम्ही मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही.
अशामध्ये अनेकजण sympathy कार्ड वापरतायत. दुर्दैवाने मराठी उद्योजक जरा कुठे व्यवसायात उतरला तर लगेच अस्मिता, अभिमान वगैरे वगैरे अशा भावनिक विषयांत पहिले जातो आणि त्यातूनच स्वतःसाठी आपल्याच समाजातले स्पर्धक तो जन्माला घालत असतो. ‘अमृततुल्य’ चहा हे याचं सगळ्यात भारी उदाहरण आहे.
पुण्याच्या प्रत्येक अळी आणि पेठेत गेल्या कैक दशकं मिळणारा अमृततुल्य चहा हा एकाने franchise करून पुण्याबाहेर आणला, तर अशा चहाचे शेकडो ब्रॅण्ड निर्माण झाले आणि आता स्वतःमध्येच स्पर्धा करत त्या सगळ्यांनीच आपली प्रगती खुंटवली आहे.
मराठी माणसाने धंद्यात उतरलं पाहिजे. याचसाठी आम्ही गेली सात वर्षं काम करतोय, पण अशा प्रकारच्या घाईने आणि अविचाराने धंद्यात उतरू नका. अभ्यास करून, नियोजन करून, नव्या संधी हुडकून आणि कमीत कमी भांडवल गुंतवून दीर्घकाळ टिकेल अशा व्यवसायात स्वतःला प्रस्थापित करा.
या लेखातून कोणी असा अर्थ घेऊ नका की नाशवंत गोष्टींचा व्यवसाय करू नये. तोही करावा पण योग्य नियोजन आणि तयारी खूप गरजेची आहे. अस्मिता आणि जात-भाषेच्या गोष्टी पुरे झाल्या, त्याच्या वर उठून गुणवत्तेच्या आधारावर स्वतःची ओळख निर्माण करा. तरच मराठी उद्योजक उद्योगजगतात आपला ठसा उमटवू शकतील.
– शैलेश राजपूत