‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेलच. उत्कृष्ट संगीत, सुरेख गायन, कलाकारांची दिलखूश करणारी अदाकारी या सगळ्या गोष्टी आपल्याला भावल्या असतीलच, पण एक उद्योजक म्हणून हा चित्रपट पाहत असताना एका वेगळ्या दृष्टिकोनातूनही या चित्रपटाकडे पाहण्याची गरज आहे.
“माझं एक स्वप्न आहे की, मला माझ्या दोन्ही गुरूंसमोर ते ज्या व्यासपीठावर बसून गायले, त्याच व्यासपीठावर बसून गायचं आहे. माझं गाणं ऐकून मला माझे दोन्ही गुरू दाद देत आहेत. त्यांचे ‘जीते रहों। गाते रहों।’ हेच बोल मला ऐकू येत आहेत.”
‘कट्यार’मधले हे संवाद ओळखीचे वाटत आहेत ना?
‘कट्यार’चा नायक सदाशिव झरीनाला आपलं हे स्वप्न सांगतो. मुळात तो ते स्वप्नं पूर्ण करण्यासाठीच जगत असतो. पुढे आपण पाहतो की, सदाशिवच्या काही चुकांमुळे त्याला खाँसाहेबांकडे आपलं गायन गहाण ठेवावं लागतं. इथपर्यंत जर आपण सदाशिवच्या त्या स्वप्नाचा मागोवा घेतला, तर आपल्या मनात नकारात्मक विचारांचा भुंगा सहज येईल आणि आता कसं पूर्ण होणार हे स्वप्न, असा प्रश्न नक्की पडेल.
पुढे या कथेला अतिशय कलात्मक वळण मिळतं आणि चित्रपटाच्या शेवटी आपण पाहतो की, सदाशिवने त्याचं स्वप्नं जसं वर्णन केलं तसं तो ते जगत असतो. जे चित्र त्याने मनाच्या कॅनव्हासवर रेखाटलेलं असतं, ते प्रत्यक्षात उतरलेलं असतं. ते स्वप्न हाच त्याच्या जीवनाचा ध्यास असतो. मृत्यूही त्याला त्याच्या स्वप्नापुढे ठेंगणा वाटत असतो.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
उद्योजक मित्रांनो, हे फक्त चित्रपटातच नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अगदी असंच्या असं होऊ शकतं; पण आपण स्वप्नं पाहायलाच भितो किंवा पुढाकारच घेत नाही. स्वप्नं पाहा, ती पूर्ण होतात यावर विश्वास ठेवा आणि त्या दृष्टीने कार्यरत व्हा! यश तुमच्या फक्त एक पाऊल पुढे तुमची वाट पाहतंय.
– टीम स्मार्ट उद्योजक
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.