₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असा हा संपूर्ण चातुर्मास अवघा महाराष्ट्र विविध सणांनी, उत्सवांनी साजरा करतो. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि सणांचा राजा म्हणजे दिवाळी हीसुद्धा याच काळात येते. अन्य समुदायांचे प्रमुख सण म्हणजे मुस्लिमांची रमजान ईद, ख्रिस्ती लोकांचा नाताळ, व्यापारी वर्गाचे नववर्ष हेसुद्धा याच चार महिन्यांच्या आसपास येते. म्हणजेच देशभरात एकूणच हा सण-उत्सव-सोहळ्याचा काळ.
महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतकरी समाज आणि शहरी भागात नोकरदार वर्ग राहतो. या सणांच्या चातुर्मासात आपण बर्याच मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. सण साजरा करायचा म्हटले की खरेदी म्हणजेच खर्च हा आलाच. म्हणजेच सणांच्या या चातुर्मासात आपण उत्तम ग्राहकवर्ग आहोत.
मराठी समाजाचे आर्थिक चित्र पालटायचे असेल तर ते बदलणे आवश्यक आहे. अन्य समुदायातील उद्योजकांप्रमाणे आपणही या काळात अधिकाधिक वेळ आपल्या धंद्याला देऊन अधिकाधिक उत्पादन आणि अधिकाधिक विक्री केली पाहिजे.
किती काळ आपण फक्त सणवार साजरे करण्यात मश्गूल राहणार आणि दुसर्यांचे ग्राहक होत राहणार? आता आपणही आक्रमक विक्रीवर भर दिला पाहिजे. मोठमोठ्याने ओरडून आपला माल विकला पाहिजे. फक्त मराठी समुदायापुरताच नाही तर जगभरात माल खपवला पाहिजे.
बर्याच अंशी मराठी उद्योजकांची ही पहिली पिढी धंद्यात आली आहे. आपण कोणत्याही मोठ्या उद्योगकुटुंबाचं उदाहरण घेतलंत तर लक्षात येईल की, पहिल्या पिढीला अपार मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही; मग ते टाटा असोत की धीरुभाई.
त्यामुळे तरुण मराठी उद्योजकाने आता निश्चय केला पाहिजे की, काहीही झालं तरी मी या सणांच्या काळात माझी विक्री किमान दुप्पट करेन आणि हा निश्चय पूर्ण करण्यासाठी स्वाभाविकच तेवढी मेहनत ही अपरिहार्य आहे.
– शैलेश राजपूत
९७७३३०१२९२