स्वाभिमानाला धक्का लागताच इंजिनिअर पदाचा राजीनामा देऊन सुरू केला स्वतःचा व्यवसाय

मी विजय पवार, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील सारसा एका खेडेगावचा. वडील अल्पभूधारक शेतकरी आणि आई गृहिणी. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगनंतर काही महिने टेक्निकल जॉब केला, पण या रॅट रेसमध्ये मन लागत नव्हते.

शेवटी एकदा एका वरिष्ठ मॅनेजरने स्वाभिमानाला धक्का लागेल असा अपमान केला आणि त्याचवेळी इंजिनिअर पदाचा राजीनामा दिला आणि आता स्वतःचा व्यवसाय करायचा, हे मनाशी पक्के केले.

तुम्हाला तुमच्या व्यवसायाची कल्पना कशी सुचली?

इंजिनिअर पदाचा राजीनामा दिल्यानंतर व्यवसाय करायचा हे नक्की होतं, पण नेमका काय व्यवसाय करायचा हे ठरलं नव्हतं. मार्केटचा अभ्यास चालू होता. वेगवेगळ्या व्यावसायिक संकल्पनांची पडताळणी चालू होती.

तेव्हा पावसाळ्यात रायगडावर गेलेलो असताना सहा तास महाराजांच्या मूर्तीसमोर पावसात बसून होतो. तेव्हा ही व्यावसायिक संकल्पना सुचली.

आजकाल पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरात घराच्या साफसफाईसाठी किंवा ऑफिसेस साफ करण्यासाठी कर्मचारी मिळणे अवघड झाले आहे आणि त्या कर्मचाऱ्यांना पगारी नोकरीवर ठेवणे घरासाठी नोकरदार वर्गाला आणि ऑफिस मॅनेजमेंटला शक्य नाही तसेच त्यांच्या गरजा या ऑन-डिमांड असतात त्यामुळे ऑन-डिमांड सर्विस पुरवण्याचा निश्चय केला आणि मार्केटची गरज तसेच ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन ऑन-डिमांड क्लिनींग सर्विसेसचा व्यवसाय सुरू केला.

तुमची उत्पादने किंवा सेवा याविषयी सांगा.

ऑन-डिमांड क्लिनींग सर्विसेसमध्ये आम्ही घर, फ्लॅट, छोट्यात छोटे आणि मोठ्यात मोठे ऑफिसेस, सोफा क्लिनींग, कार्पेट क्लिनींग तसेच प्रोजेक्ट क्लिनींग, कमर्शियल बिल्डिंग क्लिनींग इ. सर्विसेस देतो. आतापर्यंतच्या व्यावसायिक प्रवासात ४,६०० पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा पुरवली आहे.

तुमच्या व्यवसायात वैशिष्टयपूर्ण काय आहे?

आमची सेवा ही ग्राहकांच्या गरजेनुसार आहे त्यामुळे जेवढी सेवा तेवढाच खर्च होतो. तसेच आमची कंपनी मार्केटपेक्षा स्टॅंडर्ड केमिकल्स, सर्वोत्तम मशीन्स, प्रशिक्षित स्टाफ आणि तुलनेने सरासरी किंमत या आधारे सेवा पुरवतो त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरलो आहोत.

तुमचे व्यवसायाचे ध्येय काय आहे?

आनंदी आणि समाधानी ग्राहक मार्केटमध्ये तुमची किंमत तयार करतो. त्यामुळे प्रत्येक ग्राहक आमच्या सेवेमुळे समाधानी व्हावा, हे आमचे ध्येय असते. तसेच कुठल्याही संस्थेत त्या संस्थेचे कर्मचारी जबाबदारीने आणि मालकी हक्काने कंपनी ब्रॅण्डला जपत असतील, तर ती कंपनी यशस्वी ठरते. त्यामुळे आमचे कर्मचारीदेखील समाधानी असणं हे आम्ही आमचं ध्येय मानतो.

तुम्हाला कधी अपयशाचा सामना करावा लागला का? आणि त्यातून तुम्ही काय शिकलात?

व्यवसाय म्हटलं की यश-अपयश आलेच, आजपर्यंतच्या व्यावसायिक प्रवासात खूप वेळा पडलो धडपडलो, पण प्रत्येक वेळी नवीन अनुभव आणि शिकवण मिळाली. लॉकडाऊन काळात आमचं काम जवळपास ८-९ महिने बंद होते याकाळात खूप काही शिकायला मिळाले.

तुम्हाला प्रेरणा कोणापासून मिळते?

अल्पभूधारक असणारे माझे वडील आणि त्यांना तेवढ्याच ताकदीने त्यांना साथ देणारी माझी आई हे प्रेरणास्थान आहेत. तर उभ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय हे उर्जास्थान आहेत.

तुम्ही केलेल्या काही सर्वात मोठ्या चुका काय आहेत? आणि त्या चुकांतून तुम्ही काय शिकलात?

व्यवसायाच्या प्रारंभिक काळात भागीदारीत व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी केवळ आंधळा विश्वास ठेवत कुठलेही कागदपत्र किंवा करार भागीदारासोबत केला नाही ही सर्वात मोठी चूक होती. त्यामुळे व्यवसाय करताना आणि मुख्यतः भागीदारी व्यवसाय करताना प्रत्येक गोष्ट कागदोपत्री असणे गरजेचे आहे ही शिकवण मिळाली.

नव्याने व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?

नवव्यावसियाकांना एकच सांगणे आहे, व्यवसायाची निवड करताना काळजीपूर्वक संकल्पना निवडा. योग्य मार्केट स्टडी करा आणि व्यवसायात संयम ठेवा. व्यावसायिक यश एका रात्रीत मिळत नाही.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?