पेट्रोलपंपावर ₹३०० पगार घेणाऱ्याने सुरू केले पेट्रोल शुद्धिकरणाचे कारखाने

एखादी गोष्ट कठीण असू शकते, पण या जगात अशक्य असं काहीच नाही. हे वचन ज्यांनी सत्य करून दाखवलं ते धीरुभाई अंबानी. आज अंबानी हे नाव प्रत्येकाच्या जिभेवर आहे, पण धीरुभाई सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते.

परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं तसंच धीरुभाईंच्या कल्पकतेने त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं. गुजरातच्या चोरवाड या गावातील शिक्षक हिराचंद गोवर्धनदास अंबानी यांचा तिसरा मुलगा धीरजलाल. हेच पुढे धीरुभाई या नावाने प्रसिद्ध झाले.

त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी झाला. हिराचंद यांना एकूण पाच मुलं. रमणीकलाल, नटवरलाल, धीरजलाल; दोन मुली त्रिलोचना आणि जसुमती. घरची आर्थिक परिस्थितीची चांगली नसल्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडणं भाग पडलं.

बालवयापासूनच त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. गिरनार येथे त्यांनी भजीचे दुकान सुरू केले. पुढे ते नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. धीरुभाईंचे मोठे बंधू रमणीलाल एडनमध्ये नोकरी करत होते. त्यांच्यासोबत धीरुभाई राहू लागले.

सुरुवातीला ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. तेव्हा ते स्वतःचा तेलशुद्धकरणाचा कारखाना स्थापन करण्याचे स्वप्न पाहत होते. त्यांनी गुजराती खाद्यपदार्थ भारतातून मागवून ते पदार्थ एडनला विकण्यास सुरू केले. यामुळे अंबानी बंधू एडनमध्ये प्रसिद्ध झाले.

या दरम्यान ते व्यवसायासंबंधी अनेक गोष्टींची माहिती घेऊ लागले. १९५४ मध्ये ते पुन्हा भारतात आले. १९५५ साली अनेक तरुणांप्रमाणे खिशात ५०० रुपये घेऊन आपलं नशीब अजमावण्यासाठी ते मुंबईत आले आणि मुंबई ही त्यांची कर्मभूमी बनली.

धीरुभाईंनी १९५९ साली १५ हजार रुपयांची गुंतवणूक करून मुंबईत मशीद बंदर येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी यांच्यासोबत भागीदारी करून ‘रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन’ची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले.

dhirubhai ambani

हा व्यवसाय धीरुभाई भारतातून व रमणीकलाल एडनमधून सांभाळू लागले. १९७७ साली धीरुभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. आता धीरुभाई यशाच्या शिखरावर पोहोचले होते. त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. धीरुभाईंचे नाव देश-विदेशात अजरामर झाले.

६ जुलै २००२ रोजी धीरुभाई हे जग सोडून अनंतात विलीन झाले तेव्हा त्यांची संपत्ती ६२ हजार कोटी रुपये एवढी होती. कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे या सर्वसाधारण कुटुंबातल्या मुलाला कळून चुकले होते आणि स्वतःच्या हिमतीवर या मुलाने आपले स्वतःचे विश्व निर्माण केले.

धीरुभाईंनी पाहिलेलं स्वप्न साकार झालं. डोळे उघडून, जागेपणी पाहिलेली स्वप्नं साकार होतात… तुम्हीसुद्धा स्वप्नं पहा आणि ती साकार करा.

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Prime Membership Benefits