आपली क्षमता आणि बळ याच्या जोरावर अनेक मोठे उद्योग छोट्या व्यवसायांची गळचेपी करत असतात. त्यांच्यासोबत व्यवसाय करण्यासाठी त्यांच्यावर जाचक अटी ठेवतात. शिवाय ठरलेल्या अनेक अटींचेही पालन करत नाहीत.
विशेष करून हे payment च्या बाबतीत होत. अनेक ancillary व्यवसायांची हीच समस्या असते. मोठ्या उद्योगांकडून कामाचे वेळेत पैसे येत नाहीत. यामुळे अनेक छोट्या उद्योगांचे कंबरडे मोडते व त्यांना धंदे बंद करावे लागतात.
यावर उपाय म्हणून भारत सरकारने २००६ साली एम.एस.एम.इ.डी. कायदा संमत केला. यावर आधारित केंद्र सरकारने ‘एमएसएमइ समाधान’ (MSME Samadhan) हे छोट्या उद्योगांसाठी सुरक्षा कवच म्हणून आणले आहे.
आज जवळपास सत्तर टक्के सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे पैशांच्या अभावामुळे पहिल्या वर्षभरातच बंद पडतात. याचे एक मुख्य कारण असते की एमएसएमइ क्षेत्रातील बहुतांश उद्योजकांचे व्यवसाय हे मोठ्या उद्योगांवर अवलंबून असतात.
या योजनेअंतर्गत मोठ्या उद्योगांकडून ज्यांना पैसे येणे आहे, परंतु अद्याप आलेले नाहीत असे उद्योजक ‘एमएसएमइ समाधान‘ या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारी लवकरात लवकर सोडवल्या जाव्या यासाठी कोणत्या उद्योगाकडून किती रक्कम देणे बाकी आहे हे ‘एमएसएमइ समाधान’ या वेब पोर्टलवर सर्वांना दिसते.
या पोर्टलवर नोंदवलेल्या तक्रारी प्रत्येक राज्यातील मायक्रो अॅण्ड स्मॉल फॅसिलिटेशन काउनसिल (एम.एस.इ.एफ.सी) तपासते व योग्य ती कारवाई करते. या पोर्टल वर उद्योग आधार असलेला कोणताही सूक्ष्म, लघु अथवा मध्यम उद्योग तक्रार नोंदवू शकतो.
तक्रार नोंदवण्याच्या पायर्या :
- रक्कम येण्याच्या दिवसानंतर पंधरा दिवसात जर रक्कम मिळाली नाही तर उद्योजक आपली तक्रार नोंदवू शकतात.
- तक्रार नोंदणी पूर्ण झाल्यावर तक्रार नोंदवणारा व ज्याबद्दल तक्रार नोंदवली आहे त्या दोघांना एक ई-मेलद्वारे हे कळवले जाते.
- दोघांना आपापसात बोलून तक्रार सोडवण्याची संधी दिली जाते. तसे नसेल करायचे तर किंवा बोलूनही प्रश्न सुटला नाही, तर केस फाईल केली जाते.
- तक्रारीचा अभ्यास करून काऊन्सिल तक्रार स्वीकारते किंवा नाकारते.
- याचा तपशील एस.एम.एस. व ई-मेलद्वारे दोन्ही पक्षांना पाठवला जातो.
- तक्रार ऑफलाईन नोंदवली असल्यास काऊन्सिल ती तक्रारसुद्धा वेबसाईटवर नमूद करते.
- काऊन्सिल केसच्या सुनावणीची तारीख ठरवते.
- उद्योजक उद्यम रजिस्ट्रेशन नंबर किंवा केस नंबर वापरून तक्रारीची स्थिती पाहू शकतात.
- यापुढे लवकरात लवकर तक्रार सोडवली जाते.
एमएसएमइ समाधानची वैशिष्ट्ये व फायदे :
- तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.
- तक्रार नोंदवणे पूर्णपणे मोफत आहे.
- जर उद्योजकाची तक्रार खरी आहे हे सिद्ध झाले आणि उद्योजकाने सेवा अथवा उत्पादन पुरवल्यानंतर ४५ दिवसांत त्याचा मोबदला मिळाला नाही तर पैसे बुडवणार्याने उद्योजकाला चालू बँक दरापेक्षा तीन पट जास्त चक्रवाढ व्याजाने पैसे देणे बंधनकारक आहे.
- भारतभर एमएसएमइ समाधान लागू आहे.
- तक्रार नोंदवल्यानंतर ९० दिवसांच्या आत प्रत्येक केसची तपासणी होते.