नुसतेच आपण मधामध्ये शुगर सिरप किंवा इतर रसायनांची भेसळ होत असल्याची बातमी वाचली अथवा पाहिली असेल. CSE या सामाजिक संस्थेने केलेल्या NMR चाचणीत देशातील प्रमुख तेरा ब्रॅण्डसपैकी दहा ब्रॅण्ड अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये डाबर, पतंजली, झंडू, हिमालया अशा सर्व मोठ्या ब्रॅण्डसची नावे आहेत.
CSE ही तीच संस्था आहे जिने या आधी कोकोकोलामध्ये भेसळ असल्याचं उघडकीस आणलं होतं. त्यामुळे CSE च्या या अहवालाला सर्वच प्रसारमाध्यमांनी गांभीर्याने घेतलं आहे. यामुळे सामान्य ग्राहक जो आहारात किंवा वैद्यकीय कारणांनी मध घेतो तो संभ्रमात पडला आहे.
याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने सजग असलेल्या लोकांना शुद्ध मधाची गरज जाणवू लागली आहे. या ताज्या अहवालामुळे या दहा मोठ्या कंपन्या ज्यांचा मध व्यवसायात ९० टक्क्यांहून अधिक मार्केट शेअर असेल, त्यांची बाजारपेठ धोक्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला शुद्ध मध उपलब्ध करून देऊ शकतील अशा उद्योजकांसाठी मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. पतंजली आणि डाबरसह सगळ्याच मोठ्या ब्रॅण्डसना आता आपला ब्रॅण्ड वाचवायचा असेल तर शुद्ध मध उपलब्ध करून द्यावा लागेल. पण सध्या जे मधासाठी जो भाव आकारतात, त्यात हे होणं शक्य नाही.
ग्रामीण उद्योजकांसाठी ही एक दैदिप्यमान संधी आहे. बाजारात उपलब्ध मधामध्ये सध्या दोन प्रकार आहेत. एक सामान्य मध, जे मधपेट्यांमध्ये मधमाशांची पाळून त्यांच्यामार्फत गोळा केलं जातं आणि दुसरं वाइल्ड हनी म्हणजे प्राकृतिक मध, म्हणजे मधमाशांच्या पोळ्यांमधून गोळा केलं जाणार मध.
आज या दोन्ही प्रकारच्या मधांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. ग्रामीण उद्योजक मधावर प्रक्रिया आणि पॅकॅजिंगचे कौशल्य आत्मसात करून शुद्ध मधाच्या बाजारपेठेत स्वतःचा ब्रॅण्ड प्रस्थापित करू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, विशेषतः अमेरीकेत शुद्ध मधाची गरज खूप मोठी आहे. ग्रामीण भारतीय उद्योजक ही गरज भागवू शकतो.
आयुर्वेदात मधाला अमृत म्हटलं आहे. आज या अमृताची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. ही संधी उचलता आली तर लक्ष्मीचे आशीर्वाद नक्कीच मिळतील.
– शैलेश राजपूत