शेती हा खरे तर आपला प्रमुख व्यवसाय आहे; परंतु ग्रामीण भागातील तरुण आज शेतीला सोडचिठ्ठी देऊ पाहत आहे. वास्तविक शेतीत मोठ्या प्रमाणावर रोजगाराची क्षमता आहे, तसेच नियोजनबद्ध व आधुनिक तंत्राचा वापर करून बाजारपेठेचा कानोसा घेऊन शेती केल्यास त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. केवळ शारीरिक कष्ट नको म्हणून आज ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेत आहेत.
शहरातही तो फार दर्जेदार काम करीत आहे असे नाही. अनेक ठिकाणी गावाकडील तरुण हे हमाली अगर इतर तत्सम व्यवसायात रोजी-रोटी करीत असल्याचे दिसते. यामुळे ज्यांच्याकडे उपजीविका करण्याइतपत शेती आहे, जलसिंचनाची सुविधा आहे अशांनी तरी किमान शेतीची कास सोडू नये. शेतीसाठी शासन अनेक योजना राबवीत असते.
या योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. तसेच शेतीला तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्जही अल्प व्याजात मिळत आहे. त्याचा उपयोग तरुणांनी करून घ्यायला हवा. विशेषत: शहराजवळच्या भागातील लोकांनी शेती न विकता त्यावर जर भाजीपाला, फुले, धान्य, पिके घेतली तर त्यांना मोठा आर्थिक नफा मिळू शकतो. शिवाय त्यांची जमीन त्यांच्याकडे राहते. तरुणांचा शहराकडील जाणारा लोंढा थांबतो तो वेगळाच.
शेतीला पशुपालनाची विशेषत: दूध व्यवसायाची जोड देणे गरजेचे आहे. दूधामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडू शकते. किंबहुना आज शेतीपेक्षा दूग्ध व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून करावा असे सुचवावेसे वाटते. कारण दिवसेंदिवस दूधाचे दर हे वाढतच जाणार आहेत. वाढत्या लोकसंख्येची दूधाची गरज भागविणे ही शेतकऱ्यांवरची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे या व्यवसायास उर्जीतावस्था येणार आहे. दूध व्यवसायासाठी शासनाच्या अनेक कर्जयोजना आहे.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
या व्यवसायाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. दूध व्यवसायात आधुनिक तंत्रयुक्त गोठा पद्धतीचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्तीचे खेळू शकतात. याशिवाय जर या व्यवसायात दुग्धजन्य प्रक्रिया उद्योगाची जोड दिली तर अधिकच उत्पन्न मिळू शकेल.
केवळ दूध व दुग्धजन्य पदार्थच नव्हे तर शेणखताच्या व गांडूळखताच्या माध्यमातूनही अर्थार्जन होऊ शकते. शिवाय फळबागा, फुलांसारखी नगदी पिके घेऊन शेतकरी वर्गातील तरूण रोजगार मिळवू शकतात.
आज कार्नेशन, जरबेरा, रंगीबेरंगी ढोबळी मिरची, ग्रीन हाऊसमधील भाजीपाला उत्पादन याद्वारे शेतकरी चांगले पैसे मिळवू शकतात. शिवाय नर्सरी उद्योग, कृषी पर्यटन या माध्यमातूनही शेतकऱ्यांना आर्थिक उभारी घेता येऊ शकेल.
कुक्कुटपालनही चांगले पैसे मिळू शकतात. या सर्व व्यवसायासाठी शासन सवलतीच्या व्याजदराने कर्ज देते. त्यामुळे या कर्जयोजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधावी. शहरात जाऊन शारीरिक मेहनत करण्यापेक्षा स्वत:च्या शेतीत व शेतीपूरक व्यवसायात शेतकरी वर्गातील तरुणांनी मेहनत केल्यास त्यांना त्यांच्या गावातच चांगला आर्थिक लाभ मिळू शकेल.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.