भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात हजारो भाषा-उपभाषा व बोलीभाषा आहेत आणि या प्रत्येक भाषा बोलणार्यांची, त्यात व्यवहार करणार्यांची संख्याही कमी नाही. यातील प्रत्येक प्रमुख भाषेला स्वत:ची स्वतंत्र लिपी व व्याकरणही आहे.
भाषिक विविधतेचे काही लाभ तसेच काही तोटेही आहेत. एकच संदेश संपूर्ण देशात प्रसारित करण्यासाठी तो प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित करून प्रसारित करावा लागतो. तेव्हाच तो परिणामकारक होतो.
व्यवसायाच्या दृष्टीने ही भाषिक विविधता तुम्हाला संधी म्हणून घेता येऊ शकते. विविध जाहिरात कंपन्यांना एकच जाहिरात विविध भाषांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवावी लागते. एकच पुस्तक विविध भाषांत भाषांतरित होऊन प्रकाशित होतं. एकाच चित्रपटाची वा मालिकेची विविध भाषांत आवर्तने होतात. तेव्हा अशा प्रत्येक वेळी आवश्यकता असते ती भाषांतर करणार्यांची.
दुर्दैवाने आज आपल्या देशात इंग्रजीमधून शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे प्रादेशिक भाषांमधून भाषांतर करून देणार्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. अशा परिस्थितीत तुम्ही भाषांतराचे काम सुरू केलेत वा भाषांतर करून देणारी एजन्सी सुरू केलीत तर खूप चांगला प्रतिसाद मिळू शकेल.
प्रादेशिक भाषांसोबत विविध आंतरराष्ट्रीय भाषांमध्येही भाषांतर करून देण्याला बराच मोठा वाव आणि चांगला पैसाही आहे. विविध भाषांमध्ये काम करणारी काही मंडळी एकत्र येऊन सामूहिकपणेही हा व्यवसाय सुरू करू शकतात.
आधुनिक माध्यमांचा आधार घ्यायचा म्हटला तर वेबसाइटवरूनही हे काम करून देता येऊ शकेल अथवा भाषांतर करू शकणार्यांचे नेटवर्क उभे करून मोठे काम उभे करता येऊ शकेल. सोबत विविध भाषांतील टंकलेखन सेवाही उपलब्ध करून देता येऊ शकते. या व्यवसायाला देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रकाशन, जाहिरात व माध्यम क्षेत्राकडून चांगले काम मिळू शकेल.
– टीम स्मार्ट उद्योजक