स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
चीनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसह प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते व गवताचे एक पानपण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जीर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली.
या अशा ओसाड प्रदेशात कोण राहात असावे या कुतूहलाने ते त्या झोपडीजवळ गेले. तेथे त्यांना एक मध्यमवयीन चिनी जोडपे, त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडा पशु दिसला.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
तुमचे कसे भागते? गुरूंनी त्या चिनी माणसाला विचारले. त्याने त्या मरतुकड्या पशुकडे बोट दाखवले व म्हणाला, हा पशु रोज आम्हाला थोडे थोडे दूध देते. यातील काही दूध आम्ही वापरतो. उरलेल्या दुधाचे दही करून त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावात जाऊन विकतो. त्याचे जे काही थोडेफार पैसे मिळतात त्यातून इतर गरजेच्या वस्तू आणतो. आमचे कसे तरी भागते.
गुरू टेकडी उतरून खाली आले व आपल्या शिष्यांना म्हणाले, ताबडतोब त्या मरतुकड्या पशुला मारून टाका. गुरूंची ही आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले. ज्या पशुवर त्या माणसाचे जीवन चालू आहे, त्या कुटुंबाला रोजीरोटी मिळते आहे तो पशु मारून टाकायचा? शिष्यांना वाटले, आपले गुरू किती निर्दयी व निष्ठुर आहेत. कोणी शिष्य पशु मारायला तयार होईना. शेवटी हे काम गुरूंनी स्वतःच करायचे ठरवले. बोला, माझ्याबरोबर कोण येणार आहे?
त्यांनी शिष्यांना विचारले. कसाबसा एक शिष्य तयार झाला. त्या रात्री गुरू त्या शिष्याला टेकडीवर घेऊन गेले, त्या मरतुकड्या पशुला टेकडीवरून खाली ढकलले व पशु मेल्याची खात्री करून घेऊन परत आले व आपल्या शिष्यांबरोबर पुढच्या प्रवासाला लागले.
त्यांच्याबरोबर जो शिष्य गेला होता त्याला फार वाईट वाटू लागले. गुरूंनी जे केले ते पाप होते व त्या पापामध्ये आपणपण भागीदार होतो असे वाटून त्याच्या मनात शरमेची भावना निर्माण झाली. काही वर्षे त्याने ही भावना दाबून ठेवली, पण एक दिवस या भावनेचा उद्रेक झाला. त्या कुटुंबाचे काय झाले हे पाहण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. गुरूला न कळवताच तो त्या झोपडीच्या ठिकाणी आला. तेथे आल्यावर त्या शिष्याला आश्चर्याचा धक्काच बसला.
त्या क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट झाला होता. झोपडीच्या जागी एक आधुनिक, टोलेजंग बंगला उभा होता. बंगल्याच्या बाहेर अनेक आधुनिक मोटारी उभ्या होत्या. बंगल्याभोवती सुरेख बगीचा केला होता. सगळीकडे हिरवळ होती व काही शेतेपण दिसत होती. शिष्याला वाटले आपण चुकीच्या ठिकाणी आलो.
त्याने तिथल्या एका माणसाला विचारले, माफ करा, मी काही वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा हा भाग ओसाड होता. वरती टेकडीवर एक झोपडी होती. आता त्या झोपडीतील माणसे कुठे असतात?
तुमचे म्हणणे बरोबर आहे, त्या माणसाने उत्तर दिले. त्या झोपडीतील माणसे इथेच म्हणजे त्या बंगल्यात राहतात. हा त्यांचा बंगला आहे. आज त्यांच्याकडे एक कार्यक्रम आहे.
आश्चर्य वाटून तो शिष्य टेकडी चढून बंगल्यापाशी आला. त्याने पाहिले की, तोच चिनी माणूस व त्याची बायको एका भव्य सोफ्यावर बसले आहेत व त्याची तीन तरुण मुले उत्साहाने सगळ्यांचे स्वागत करत आहेत. तो शिष्य त्या बंगल्यात गेला व त्या चिनी माणसाला म्हणाला, काही वर्षांपूर्वी मी माझ्या गुरूंबरोबर येथे आलो होतो. त्या वेळी तुम्ही एका मोडक्या, जीर्ण झालेल्या झोपडीत तुमच्या तीन मुलांबरोबर राहात होतात. तुमच्याकडे एक हडकुळा पशुपण होता.
अगदी बरोबर आहे. तो चिनी माणूस उत्तरला. एका रात्री आमचा पशु टेकडीवरून खाली पडला व मेला. आमचा तर आधारच हरपला. जगायचे कसे, हा प्रश्न उभा राहिला, कारण तोपर्यंत आम्हाला पशुच्या दुधावरच जगायची सवय होती. जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते.
हळूहळू आमच्या असे लक्षात येऊ लागले की, आमच्याकडे अनेक कौशल्ये आहेत जी आम्हाला ठाऊक नव्हती. आम्ही त्या कौशल्यांचा विकास करायला सुरुवात केली, उद्योग-व्यवसायात पदार्पण केले. हे तीन तरुण माझी मुले आहेत. तुम्ही याचे परिणाम बघताच आहात. जर आमचा पशु मेला नसता तर हे घडले नसते.
आता त्या शिष्याला कळले की गुरू तो पशु मारायला का सांगत होते. त्याला आपल्या गुरूंच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले व गुरूंसाठीचा आदर कित्येक पटीने वाढला.
अनेकांच्या आयुष्यात असाच एक पशु असतो, ज्याला ते ‘नोकरी’ असे म्हणतात. अनेकांची नजर या अशा पशुवरच असते. या पशुचे जे दूध मिळते (म्हणजे पगार मिळतो) त्यावर भागवण्याची सवय लागते. कोणाच्या नशिबात धष्टपुष्ट पशु येतो तर काहींना किरकोळ पशु मिळतो तर काहींच्या नशिबात अशी पशुच नसतो.
बर्याच लोकांचे सगळे कर्तृत्व त्याच्या नोकरीवर व नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ज्याला उत्तम नोकरी मिळते तो जास्त कर्तृत्ववान, ज्याला बरी नोकरी मिळते तो कमी कर्तृत्ववान व ज्याला नोकरीच मिळत नाही त्याला कंडेम समजण्यात येते. मराठी माणसाची प्रगती ही त्याच्या नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते.
माझा नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला हे एखाद्या गृहिणीचे वाक्य मोठ्या कौतुकाने सांगितले जाते व ऐकले जाते. जणू काही नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला म्हणजे त्याने फार मोठा पराक्रम केला असा थाट या वाक्याभोवती असतो, पण किती झाले तरी नोकरी ही एक मरतुकडा पशुच असते, कारण तो पुरेसे दूध कधीच देत नाही.
माझ्या नवर्याचा धंदा एका लाखाचा एक कोटी रुपये झाला. हे एखाद्या गृहिणीचे वाक्य फारशा कौतुकाने बोललेपण जात नाही व ऐकलेपण जात नाही. माझे वडील बँकेत मॅनेजर आहेत. हे वाक्य ज्या अभिमानाने मुलाकडून सांगितले जाते त्याच अभिमानाने माझ्या वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे हे वाक्य सांगितले जात नाही. लग्न करणार्या मराठी मुलींना तर फक्त नोकरी करणारीच मुले हवी असतात.
मामलेदार कचेरीत शिपायाची किंवा पट्टेवाल्याची नोकरी करणार्या मुलाला हुंड्यासकट मुलगी मिळते, पण वर्षाला ५० लाख रुपये उत्पन्न असलेल्या पण धंदा करणार्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअपसाठी अनेक योजना जाहीर करून उद्योग व्यवसायाच्या संधीचे भले मोठे दार उघडून दिले आहे. पण किती लोक याचा किती फायदा करून घेणार आहे, हा कळीचा मुद्दा आहे.
– प्रकाश भोसले
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.