ग्रामीण भागातील तरुणांसाठी ८ उद्योगसंधी!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


भारत जगातील सर्वात जास्त स्टार्टअप्स सुरू होत असलेल्या पहिल्या तीन देशांमध्ये येतो; परंतु या स्टार्टअप्समध्ये अजूनही शहरांचाच समावेश जास्त आहे, गावांतून यात हवे तितके योगदान दिसत नाहीये. इतके दिवस गावा-गावांकडून शहरांकडे नोकरी-व्यवसायाकरिता बरेच लोक येत; परंतु आता हळूहळू हे चित्र बदलत आहे.

शहरात जाऊन कोणत्या तरी कंपनीत राबत बसण्यापेक्षा काही लोक आजकाल पुन्हा आपल्या खेडेगावांकडे वळत आहेत, परंतु त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न आहे की गावांत जाऊन शेतीशिवाय आणखी करणार काय? अशाच नवउद्योजकांसाठी या आठ उद्योगसंधी.

कचरा व्यवस्थापन

बऱ्याच जणांना वाटेल की, गावात जाऊन मी काय कचरा उचलू! पण जो खरा उद्योजक असेल त्याला यात संधी दिसेल, कारण आज भारतातील बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे व्यवस्थापन हा एक मोठा प्रश्न होत चालला आहे. त्यामुळे जो आपली कल्पनाशक्ती लढवून यावर उपाय शोधू शकेल आणि त्यानुसार आपले उत्पादन तयार करू शकेल, त्यासाठी हे सोन्याची खाण मिळाल्यासमानच आहे.

सुरुवातीला भांडवल, कर्मचारी यांची कमतरता भासेल, परंतु जर आपले उत्पादन खरोखर उपयोगी असेल तर सरकारसुद्धा यात आपल्याला मदत करण्याची शक्यता आहे.

खाद्यपदार्थांचे ट्रक्स

आपण सर्वांनीच कधी ना कधी ढाब्यावर जेवले असेल; पण हॉटेलमध्ये बसून जेवण्याची मजा आणि या ढाब्यांवर जेवण्याची मजा फार वेगळी असते. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थांचे ट्रक्स ही सध्या एक नवीन कल्पना अधिकाधिक प्रसिद्ध होत आहे. ट्रकच्या वापरामुळे आपण वेगवेगळ्या जागांवर, वेगवेगळ्या गावांत जाऊन व्यवसाय करू शकतो.

तसेच लोकांनी हॉटेलमध्ये येण्याऐवजी जर हॉटेलच ट्रकरूपात लोकांकडे गेले तर त्याला नक्कीच पसंती मिळेल. शाळा-कॉलेजेसच्या आवारात बाजार भरतो त्या ठिकाणी किंवा जिथे लोकांची जास्त वर्दळ असते अशा कोणत्याही ठिकाणी आपण हा ट्रक नेऊ शकता.

बालवाड्या

आजकाल गावागावांमध्ये प्राथमिक शिक्षण तर पोचले, परंतु अजूनही बालवाड्या फार जास्त नाहीत. त्यामुळे एखाद्या नवउद्योजकासाठी ही उत्तम संधी होऊ शकते. शहरांप्रमाणेच गावातल्याही पालकांना जेव्हा ते कामावर जातात तेव्हा त्यांच्या मुलांना सांभाळणारे कुणी तरी हवेच असते. त्यामुळे बालवाडी आणि पाळणाघर असे एकत्रसुद्धा तुम्ही सुरू करू शकता. यात लहान मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी मात्र उत्तम प्रकारे पार पाडावी लागेल.

वाचनालय + कॅफे

जिथे आपल्याला वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळतील आणि शिवाय जिथे कॅफेसुद्धा उपलब्ध असेल अशा जागा शहरांमध्ये खूप लोकप्रिय आहेत; परंतु अशा प्रकारचे कॅफे अजूनही खेडेगावांत दिसत नाहीत. असे कॅफे जर गावांत आले तर ते तिथेसुद्धा प्रसिद्धी मिळवू शकतात. यात कॅफेसोबत आपण आपल्या कल्पनाशक्तीनुसार इतर काहीसुद्धा सुरू करू शकता. जसे मीटिंग करण्यासाठी योग्य अशी जागा तयार करणे, ग्राहकांना मोफत गाणी ऐकायला देणे, असे अनेकविध प्रयोग तुम्ही करू शकता.

सायबर कॅफे

गाव असो वा शहर, इंटरनेट आणि कॉम्प्युटर्सची गरज आज सगळीकडेच आहे. शहरात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे आता इंटरनेट सुविधा पोहोचली आहे; परंतु गावागावांत अजूनही इंटरनेट हवे तितके पोहोचले नाही.

अगदी शाळा-कॉलेजचे फॉर्म भरण्यापासून ते शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी गावातील लोकांना इंटरनेटची गरज असते. त्यामुळे काही मोक्याची ठिकाणे जसे गावबाजार भरतो ते ठिकाण किंवा रेल्वे स्थानकांबाहेर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सायबर कॅफे उघडू शकता. अगदी एका संगणकापासूनही सुरुवात करता येईल.

जिमनॅशियम

आज बहुतांश लोकांना सुदृढ आणि सशक्त राहण्याचे महत्त्व पटले आहे. यालाच संधी मानून तुम्ही खेडेगावांत तुमचे जिम सुरू करू शकता; परंतु बर्‍याच ठिकाणी तुम्हाला जिममध्ये लागणार्‍या मशीन्ससाठी जो सतत वीजपुरवठा लागतो तो कदाचित उपलब्ध नसेल किंवा ती मशीन्स घेण्याइतकं भांडवल आज तुमच्याकडे नसेल. यावर पर्याय म्हणून तुम्ही सुरुवात योगासने शिकवून करू शकता. एकदा तुमच्या व्यवसायात पैसे येऊ लागले की तुम्ही अनेक बदल तसेच सुधारणा करू शकाल.

घर/बागकाम करून देणारी कंपनी

झाडांवर चढून नारळ-सुपार्‍या काढण्यापासून गोठा सांभाळण्यापर्यंत अनेक कामं गावा-गावांत होत असतात. आज बर्‍याच ग्रामीण भागांत शेती व्यवसाय मागे पडत चालला आहे. याचे मूळ कारण म्हणजे लोकांची कमतरता. जर अशी कामं करून देणार्याव व्यक्ती लोकांना सहज उपलब्ध झाल्या तर! ज्याप्रमाणे एक बटन दाबताच ओला/उबर टॅक्सी आपल्या दारात येऊन उभी राहते, त्याचप्रमाणे जर तुम्ही या सुविधा पुरवणारा उद्योग चालू केलात तर तो नक्कीच लोकप्रिय होईल.

पर्यटन

उन्हाळी सुट्टी असो, दिवाळीची सुट्टी असो, नाताळची सुट्टी असो किंवा एखादा ‘लाँग विकेंड’ असो, लोकांना आज धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून काही दिवस आराम आणि मजा करायला खूप आवडते. त्यामुळे आपल्याला परिचित एखादे गाव असेल जिथे कोणते प्रेक्षणीय स्थळ असेल किंवा सुंदर समुद्रकिनारा असेल तर आपण नक्कीच पर्यटन व्यवसाय सुरू करू शकता.

यातील काही जरी नसेल आणि निव्वळ शांत गाव असेल तरीसुद्धा आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. लोकांना शांततेत येऊन आराम करायलासुद्धा आवडतोच की! शिवाय आपण बिझनेस मीटिंग पॉइंट असेसुद्धा काही काढू शकता जिथे लोकांना मीटिंग करण्यासाठी शांत वातावरणसुद्धा मिळेल.

कोणताही उद्योग सुरू करताना पैशाची, लोकांची, जागेची गरज असते; परंतु कोणताही उद्योग या गोष्टींवर फार आवलंबून नसतो. एखाद्या उद्योग सुरू करून तो यशस्वीरीत्या करण्यासाठी गरज असते ती एका उत्तम कल्पनेची. ही कल्पना तुम्हाला आवडते की नाही यापेक्षा लोकांना किती आवडते हे महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणताही उद्योग सुरू करण्यापूर्वी आपली त्यामागची कल्पना नीट पडताळा!

– टीम स्मार्ट उद्योजक

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?