आर्थिक स्वातंत्र्यापासून आपण इतके दूर का?

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्या आधीच्या पिढीमधील पणजोबा, आजोबा, बाबा यांनी मोठ्या मेहनतीने हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिले आहे. वेळप्रसंगी बलिदानही दिले आहे. थोडक्यात स्वातंत्र्य हे सहज मिळत नाही, तर त्यासाठी योग्य नियोजन, संयम, बलिदान, कठोर नियम, दूरदृष्टी, कणखरपणा हे आवश्यक आहे.

त्याच अनुषंगाने आज आपण आपल्या आर्थिक स्वातंत्र्यकडे बघणार आहोत. काय आहे आर्थिक स्वातंत्र्य? खूप पैसा कमावणे व चैन करणे म्हणजे यशस्वी होणे असे नाही. तर किमान भविष्यातील मूलभूत गरजा आपण भागवु शकतो का? “उद्याच उद्या पाहू”पासून “कल का किसने देखा है” इतपत आपण डायलॉग सिनेमात ऐकत आलो आहोत. पण खरंच ते योग्य आहे का?

आज देशातील १० टक्के लोकांकडे जर का ९० टक्के संपत्ती आहे म्हणजे ९० टक्के लोकांचं नियोजन कुठे तरी चुकत आहे हे नक्की. वाढती महागाई बघता आपली कमाई ही नेहमीच अपुरी पडणार हे वास्तव आहे, पण योग्य नियोजनाचा अभाव, दूरदृष्टी व बलिदान या गोष्टी अंगिकारल्या तर काही कठीण नाही. श्रींमत व्हा असे म्हणणे नाही, पण निदान समृद्ध होणे तरी आपल्या हातात आहे.

आपण एक लाखाचा फोन घेऊ शकतो व ते पैसे व्यवसायात गुंतवणूक करताना धोका जाणवतो. गुंतवणूक विषयावर बोलणे, ऐकणे कंटाळवाणे, निरस वाटते; पण युट्यूबवर म्हणा किंवा ओटीपी प्लॅटफॉर्म्सवर तास न तास वेब सिरीजसाठी आपल्याकडे वेळ असतो. या गोष्टीही आवश्यक असतीलच, पण पुढे भविष्यात वाढणार्‍या महागाईबद्दल काय?

आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हे सहजासहजी शक्य नाही. त्यासाठी आपली मनाची तयारी हवी. आपण बारा-चौदा तास नोकरी-व्यवसाय करत असतो, का तर पैसे मिळवून सुखी होण्यासाठी; पण इतके तास काम करून जे पैसे कमावतो ते योग्य ठिकाणी गुंतवतो का?

सध्या महागाईचा दर किती टक्के आहे व आपण गुंतवणूक करत असलेल्या पर्यायांमध्ये व्याज किती मिळते? याचा आपण कधी विचार करतो का? तुमचे पैसे सर्व गुंतवणूक पर्यायांमध्ये असणे आवश्यक आहेत. बँक ठेवी, म्युच्युअल फंड, आवर्ती ठेव, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, पोस्ट खाते, बचत खाते, सोने, जमीन, शेअर्स इत्यादी. जेणेकरून तुम्ही किमान महागाई दराहून थोडा तरी अधिक परतावा मिळवू शकाल.

आपण हे सर्व टाळून झटपट पैसे कमावण्याच्या नादात पोंझी स्कीमचे शिकार बनतो व आपले पैसे गमावून बसतो. हे टाळण्यासाठी गुंतवणूकविषयी शास्त्रशुद्ध माहिती असलेल्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे.

एखादे मोठे आजारपण उद्भवल्यास आपल्याला हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच मेडिक्लेमची आठवण येते. टर्म इन्शुरन्सच्या बाबतीत हीच उदासीनता दिसून आली आहे. विम्याच्या दृष्टीने किमान या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत. आपण दर महिन्याला इएमआय भरतो, त्याचे किमान सहा महिन्यांचे पैसे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.

आपल्या दरमहा खर्चाच्या आठ महिने पैसे आपल्याकडे आवश्यक आहेत. ते का? हे कोरोनाने आपल्याला शिकवले आहे. आपण कोरोनाच्या सहा महिन्याच्या कालावधीत कोलमडले तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की वयाच्या साठीनंतर आपले उत्पन्नच थांबले तर पुढची वर्षे कशी काढू शकतो?

आपण लाखो रुपयांचे कर्ज काढून त्याचा इएमआय आनंदाने भरत असतो, पण त्याच आनंदाने इएमआयइतकी रक्कम आपण दर महिन्याला गुंतवणूक म्हणून कशात गुंतवतो का? याचे उत्तर ‘नाही’ असेच येते, कारण इएमआय हे बंधन आहे व गुंतवणूक हा पर्याय. आपण अगदी मोबाईलपासून घरापर्यत सर्व गोष्टी इएमआयवर खरेती करतो व आयुष्यभर त्याच्या ओझ्याखाली जगतो.

तेच फेडता फेडता पन्नाशी येते व बघता बघता साठचे होतो. योग्य नियोजनाचा अभावामुळेच आपण अनेकांना साठीनंतर नाईलाजाने मिळेल ती नोकरी करताना पाहतो. आता उशीर झाला असतो. आईनस्टाईन यांनी सांगितले ते खोटे नाही चक्रवाढ व्याज हे जगातील आठवे आश्चर्य आहे, ज्याला कळलं त्याला कळले.

थोडक्यात आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा सहजासहजी मिळत नाही योग्यप्रकारे नियोजन करून त्यावर विजय प्राप्त करावा लागतो. आपल्या घरातील लहान मुलांना पहिल्यापासून तशी शिकवण, बाळकडू द्यायला हवे. जितक्या लवकर आपण गुंतवणुकीसाठी सुरुवात करतो तितके उत्तम, मग अगदी महिन्याला शंभर रुपये का असोत ना. त्यात नियमितता ठेवा तुम्हाला नक्कीच आर्थिक स्वातंत्र्य मिळणार हे नक्की.

टर्म प्लॅन + मेडिक्लेम + योग्य गुंतवणूक पर्याय (त्यातही विविधता हवी, पण त्यातून येणार परतावा हा महागाई दरापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे) या त्रिसूत्रीकडे तुम्ही लक्ष द्या तर भविष्यात तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवाल असे समजा.

– दीपक जोशी
संपर्क : 9967072125
(लेखक म्युच्युअल फंड विक्रेते आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?