कोरोना साथीच्या या भीषण काळात उद्योजकाने काय काळजी घेतली पाहिजे?

एक नोकरदार हा आपल्या घराचा पोशिंदा असतो. त्याच्या प्रकृतीला काही झालं तर त्याच कुटुंब संकटात येऊ शकतं. परंतु एक उद्योजक हा स्वतःच्या घरासोबत किती तरी आणखीही घरांचा पोशिंदा असतो. त्याचे कर्मचारी, त्यांची कुटुंब, पुरवठादार, अशी ही एक मोठी साखळीच आहे, जिच्या मध्यभागी उद्योजक आहे. यामुळे उद्योजकाने अशा भीषण साथीच्या रोगांच्या काळात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सर्वात पहिला घटक येतो तो त्याचा कर्मचारी. उद्योजकाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे. कंपनीची आर्थिक स्थिती सक्षम असेल तर त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचीही वैद्यकीय चाचणी केली पाहिजे. या चाचणीदरम्यान जे कर्मचारी प्रकृतीने अस्वस्थ आढळून येतील त्यांना तात्काळ सक्तीची रजा देऊन उपचार घेण्यासाठी पाठवले पाहिजे. ज्यांचे कुटुंबीय अस्वस्थ असतील त्यांनाही सक्तीची रजा दिली पाहिजे. एक कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य आजारी असेल तर त्याचा प्रादुर्भाव अन्य कर्मचाऱ्यांवरही होऊन संपूर्ण व्यवसायावर होऊ शकतो.

बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंधित करणे

व्यवसायाच्या ठिकाणी अनेक जण बाहेरून येत असतात; जसे की कुरिअर बॉय, पोस्टमन, कच्च्या माल घेऊन येणारे, ट्रान्सपोर्टवाले इत्यादी. या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक आजार आपल्या कार्यस्थळी येऊन धडकू शकतात. त्यामुळे यांना बाहेरच थांबवून त्यांच्याशी दुरून व्यवहार करण्याची पद्धत विकसित करण्याची गरज आहे.

ऑनलाईन मीटिंग करणे

उद्योजक म्हटला की त्याला रोज अनेक लोकांना भेटावच लागतं, परंतु सध्याचा हा कठीण काळ पाहता समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याऐवजी virtual मीटिंग करता आली तर जास्त सोयीचे ठरू शकते. वेबकॅमद्वारे १-२-१ किंवा ग्रुप मीटिंग (कॉन्फरन्स) होऊ शकते. यातून लोकांना भेटणे आणि संसर्ग टाळणे शक्य होऊ शकते.

ग्राहकांशी दुरून व्यवहार करावा

ज्या व्यवसायात दररोज विविध ग्राहकांशी संबंध येतो, जसे की व्यापार, दुकानदारी क्षेत्र तिथे ग्राहक आणि आपण किंवा आपले कर्मचारी यांच्यात किमान एक मीटर तरी अंतर असेल याची काळजी घ्यावी.

रोख किंवा कार्ड्सचे व्यवहार टाळून UPI चा वापर वाढवा

रोखीने किंवा कार्डने व्यवहार करतानाही संपर्कात येऊन संसर्ग होण्याची शक्यता आहेच, त्यामुळे रोख रक्कम किंवा कार्ड्सऐवजी UPI द्वारे payment स्वीकारण्याची सोय उपलब्ध करा. भीम, गुगल पे, फोनपे, Paytm इत्यादी UPI app वापरणाऱ्यांची संख्या सध्या बरीच मोठी आहे त्यामुळे तुमच्या ग्राहकांनाही payment करणे सोयीचे ठरू शकते. ‘कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही UPI द्वारे रक्कम स्वीकारण्याला प्राधान्य देतो’, अशी पाटी लावली असता लोक तुमच्या निर्णयाचे नक्कीच स्वागत करतील आणि तुम्हाला सहकार्य करतील.

आपल्या व्यवसायात किती ठिकाणी माणसांचा एकमेकांशी संबंध येतो याचे विचारपूर्वक निरीक्षण करून अशा विविध प्रासंगिक उपाययोजना करता येऊ शकतील. देशाच्या अर्थव्यवस्थेत उद्योजक हा महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे त्याने स्वतःची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे.

– शैलेश राजपूत

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?