एका काडीने क्रांती

ही लहान गोष्ट अनेकांना नव्या उद्योगाची प्रेरणा देईल. कडुनिंबाच्या एका काडीने क्रांती होऊ शकेल. नव्हे झाली आहे त्याची ही गोष्ट. महाराष्ट्रातले एक सर्वसाधारण गाव. नीमगाव. मुख्य धंदा शेती, पण आता शेती फायद्यापेक्षा तोट्याचीच झाली आहे. म्हणजे शेतकर्‍यांसाठी तरी तोट्याची झाली आहे.

शेती तशी फायद्याची आहे. जर तुम्ही बियाणे, खते, कीटकनाशके विकत असाल तर! त्या खेड्यातला एक बेरोजगार तरुण गोपाळ. नोकरी मिळत नाही. शेत पिकत नाही. काय करावे समजत नाही. तशात फसवाफसवी जोरात. नोकरीची आश्वासने देवून फसवणारे खूप. त्या फसवणार्‍यांना पाठीशी घालणारेसुद्धा खूप. अशी ही परिस्थिती.

त्या रात्री झोपण्यापूर्वी गोपाळ ‘One Straw Revolution’ हे पुस्तक वाचत होता. डोळा कधी लागला त्याला समजलेच नाही. सकाळी तो नेहमीपेक्षा जरा लवकर उठला. चालत चालत शेतात पोहोचला. शेतात टोमॅटो होते, पण तोडण्याचा खर्च निघेल एवढा भाव नव्हता.

शेतात कडुनिंबाचे एकमेव झाड होते. त्याच्या मनात काय आले कोण जाणे, त्याने झाडाला नमस्कार केला. एक निंबोळी त्याच्या अंगावर पडली. त्याने निंबोळी सरळ तोंडात टाकली.

त्याला आश्चर्य वाटले की त्याची तंबाखूची तलफ नाहीशी झाली आहे आणि तोंड स्वच्छ झाले आहे. जेव्हा जेव्हा तलफ येते, तेव्हा तेव्हा निंबोळी म्हणा नीमची पाने म्हणा सेवन करून तो तंबाखूमुक्त झाला. त्याने मित्रांना ही युक्ती सांगितली. अनेकांना तंबाखू सोडायचा असतो, पण या व्यसनाची तलफ त्यांना आडवी येते.

‘आपणासारखे करिती तत्काळ’, या उक्तीप्रमाणे त्याने अनेक मित्रांना तंबाखू, गुटखा, सिगारेटपासून मुक्त केले. कडुनिंबाचे अनेक उपयोग आहेत. आरोग्यासाठीसुद्धा आहेत. म्हणून तर नव्या वर्षाची सुरुवात आपण कडुनिंबाची पाने खाऊन करतो.

शास्त्रोक्त भाषेत सांगायचे तर कडुनिंबामुळे रक्त शुद्ध होते, त्यामुळे आरोग्य मिळते. व्यसनाच्या बाबतीत रक्त शुद्ध झाले की व्यसने सुटतात.

गोपाळने कडुनिंब या विषयाला जणू वाहून घेतले. आता तो टूथपेस्टच्या जागी निमची काडी वापरू लागला. गोड गोड टूथपेस्ट जीवाणूंना आवडतात. दात आजारी पडू लागतात. कडूनीमच्या काडीचे अनेक फायदे आहेत. ही काडी जैविक असते. काडीचा ब्रश, काडी हीच पेस्ट.

आता गोपाळने शेतातल्या घळीमधून जेथून पावसाचे पाणी वाहून जाते तेथे तेथे खड्डे करून निमच्या बिया लावल्या. त्यासाठी त्याला त्याच्या मोबाईलचा चांगला उपयोग झाला.

विकल्याशिवाय पैसा येणार नाही. यासाठी त्याला मोबाईल उपयोगी पडला. तो सरकारी पोर्टल ONDT वरून विक्री करू लागला. हे अनेकांना उपयुक्त आहे हे जाणवले.

ONDT पोर्टलमुळे त्याची उत्पादने विकणे सोपे झाले. उत्पादने करताना सूर्यप्रकाशात वाळवण करणे, दळणे, पॅक करणे अशी कामे करावी लागतात. मागणी चांगली असल्याने गावात नवे रोजगार निर्माण झाले. अनेकांना काम मिळाले. होता होता गावाचे नाव या जगावेगळ्या उत्पादनांनी व्हायरल झाले.

गोष्ट छोटी आहे. मात्र येथे आपणास अनेक वैश्विक नियम दिसतील. जितक्या वेळा वाचाल तितक्या वेळा नवीन शोध सापडतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक बेरोजगारांना त्याच्या गावातून जग जिंकण्याचा संधी सापडतील.

– पद्माकर देशपांडे
संपर्क : 9325006291

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?