जर आपल्याला घरगुती पद्धतीचे जेवण, नाश्ता किंवा मस्त खमंग खाद्यपदार्थ, कुणी बाहेरही तितक्याच आपुलकीने मायेने करून खायला घालत असले तर किती छान ना. याशिवाय आपल्याला लागणारी पिठेही तिथेच अगदी सहज उपलब्ध होत असतील तर…
गरमागरम घडीच्या पोळ्या, फुलके किंवा भाकरी अथवा वाफाळलेला गरमागरम आमटीभात जर मिळू लागला तर अजून दुसरे काय हवे? ताजे, रुचकर आणि सात्त्विक असे जेवण आणि कधी तरी पंजाबी भाज्या किंवा पुलाव वगैरे मिळाल्यास अजून ते जिभेचे चोचले काय पुरवावेत? मायेच्या हाताची मराठमोळी चव अशी अजून कुठे चाखावयास मिळेल?
प्रत्येकाच्या मनात शिरण्यासाठीचा मार्ग हा मुखावाटे उदराकडून मनास मिळतो. हे ओळखूनच अशाच एक अन्नपूर्णेचा आशीर्वाद लाभलेल्या सुगरण गौरी महाजन यांचा आपण परिचय करून घेत आहोत. त्यांनी अभियांत्रिकी डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्या आयटी क्षेत्रात तब्बल वीस वर्षे कार्यरत होत्या.
त्यांना बालपणीपासूनच हॉटेल व्यवसायाची आवड होती, तसे त्यांचे स्वप्नच त्यांनी उराशी बाळगले होते; पण लग्न, नोकरी यातून काही ते साकार झाले नाही; परंतु पुढे नोकरी सोडल्यावर त्यांनी आधी त्यासाठी सहा महिन्यांचा डी. वाय. पाटील महाविद्यालयात कॅटरिंगचा कोर्स केला म्हणजे तसे रीतसर शिक्षणच घेतले. त्यानंतर मग त्यांची खरी व्यवसायाच्या दृष्टीने सुरुवात झाली.
साधारणपणे चार वर्षांपूर्वी त्यांनी पिठाचे दुकान सुरू करून ह्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्याआधी त्या हा व्यवसाय घरूनच करत असत. मोदक पीठ, गहू, तांदूळ पीठ अशी पिठे त्यांच्या दुकानात मिळतात. त्याखेरीज नाचणी डोसा पीठसुद्धा लोकांच्या कमालीचे पसंतीस उतरले आहे.
हे पीठ तर मुलांसाठी पौष्टिक तर आहेच, पण पटकन बनवून खातासुद्धा येते, अगदी पटकन याचे डोसे तयार करता येतात. त्यामुळे आता कामावर जाणार्या महिला किंवा गृहिणी हे पीठ महिनाभर पुरेल इतके विकत घेऊन जातात. त्यांच्या ह्या उत्पादनास ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
याच व्यवसायासोबत त्यांनी जेवण, नाश्ता हेही सुरू केले आहे. त्यांच्या नजीकच हॉस्टेल असल्याने तेथील प्राध्यापक, विद्यार्थी त्यांच्याकडे जेवण्यास आवर्जून येतात. घरगुती जेवण फक्त ८० रुपयांमध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहे. ही तर त्यांची खासियत आहे. उपवासाचे थालीपीठ हे नेरूळमध्ये कोणाला माहितीच नव्हते.
गौरीजींनीच ह्याच्या चवीची ओळख करून दिली. तसेच त्यांच्याकडे शुक्रवार आणि शनिवार पुलाव आणि पनीरशी निगडित खास भाज्या उपलब्ध असतात. रविवारी मात्र दुकान बंद असते.
गौरीताई इतक्यावर थांबलेल्या नाहीत, तर आता त्या याव्यतिरिक्त मंगलसमयी समारंभाच्या जेवणाच्या ऑर्डर्ससुद्धा घेतात. आजवर अनेकांना नाश्ता, जेवण, तर काहींना अल्पोपाहार पुरवल्याचे त्या सांगतात. तब्बल २५० व्यक्तींच्या जेवणाचीही ऑर्डर पूर्ण केल्याचे त्या अभिमानाने सांगतात. त्यांना ह्या व्यवसायाची वृद्धी करायची आहे. भविष्यात अजून तीन दुकाने थाटण्याचे त्यांनी योजिले आहे. त्याशिवाय मंगल कार्यालयांसोबत कॉन्ट्रॅक्ट करण्याचेही त्यांच्या मनात आहे.
सध्या त्यांची उत्पादने इबे आणि अॅमेझॉनसारख्या नामांकित अशा बड्या ब्रँड्सवर उपलब्ध आहेत. त्यावरून त्यांचे उत्पादन सातासमुद्रापार यू.एस.लापण पोहोचले आहे. पुढे स्विगी, झोमॅटो, उबर इट्स अशा मोठ्या कंपन्यांशी टायअप करण्याची योजना आखली आहे. वयोवृद्ध लोकांसाठी त्या खास सौम्यसा स्वयंपाक करतात, तर रुग्णांसाठी त्या वेगळे जेवण बनवतात. आता हल्लीच्या जगात व्यवसाय करून चार पैसे कमविणे हेच उद्दिष्ट सर्व जण डोळ्यासमोर ठेवून व्यवसाय करताना इतके तर्हेतर्हेचे नानाविध विचार कोणी करते का?
पण गौरी महाजन ह्या सुगरण व्यावसायिक व्यक्तिमत्त्वास सर्व काही उमगले आहे. नुसतेच उमगले नसून त्या दृष्टीने त्या पावलेही पुढे टाकत आहेत. सात्त्विक, शुद्ध आणि आरोग्यास पोषक असा आहार सर्वांना मिळण्यासाठी त्या कटिबद्ध असल्याचे सांगतात. तीस प्रकारचे वैविध्यपूर्ण नैसर्गिक सुवासिक आणि चवीसह वैशिष्ट्यपूर्ण मसाले उत्पादन आणण्यात त्यांचा अधिकाधिक भर आहे.
त्याचसोबत २०२१ सालापर्यंत जागतिक पातळीवर ‘डेसी डेलिश’ या आपल्या कंपनीला त्यांना न्यायचे ध्येय त्या उराशी बाळगून आहेत. तर अशा सर्वांचा पराकोटीचा विचार करणार्या आणि मायेनं खाऊ घालणार्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वास मनापासून सलाम.
संपर्क : गौरी महाजन – 9967546508