लॉकडाउन एक संधी

शीर्षक वाचून थोडे आश्चर्यचकीत होणे साहजिक आहे, परंतु एका दृष्टीने बघीतले तर नक्कीच तथ्य वाटेल. मुळात सध्याची परिस्थिती बघता, एक व्यावसायिक म्हणून मी असे अजिबात म्हणणार नाही की लोभी होऊन किंवा फक्त पैसा कमावणे या दृष्टीने मार्केटकडे पाहा, परंतु शासनाच्या नियमात राहून, आपली व कुटुंबाची काळजी घेऊन आपण आपले अर्थार्जन कसे करू शकतो यावर थोडा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

आपण हे थोडक्यात जाणून घेऊया की कोरोना ही जागतिक महामारी येण्याआधी एकंदरीत जागतिक बाजारपेठेत काय बदल घडत होते.

आर्टिफिशल इंटेलीजन्स

तंत्रज्ञानातील वाढती प्रगती, सॉफ्टवेअर, रोबोट इत्यादींचे वाढते प्रमाण एका नव्या युगाच्या सुरुवातीची चाहूल देत होतीच. मध्यंतरी माझ्या वाचनात मर्सिडीज कंपनीच्या मालकाचा एक लेख आला होता.

त्यात ते म्हणतात की, “आमची स्पर्धा ऑडी किंवा बीएमडब्ल्यूसोबत नाही राहिली, आता आम्हाला टेस्ला आणि गुगलला सुद्धा विचारात घेणे आवश्यक आहे. टेस्लाने विजेवर चालणारी, आरामदायी अशी स्टोर्ट्स वाहने काढली आहेत. गुगल तर चालकविरहीत वाहने काढण्याच्या तयारीत आहेत. टेस्ला व गुगल या प्रयोगांत यशस्वी झाले, तर खूप मोठ्या इकोसिस्टमला धक्का बसणार आहे.”

इकोसिस्टम म्हणजे काय?

थोडक्यात सांगायचे तर एकमेकांवर अवलंबून असलेल्या व्यवसायाची साखळी. हेच उदाहरण द्यायचे झाले तर टेस्ला आणि गुगल यशस्वी झाले तर ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, स्मॉल स्केल इंडस्ट्री, इन्शुरन्स, हेल्थ, आयटी अशा बऱ्याच क्षेत्रातील इकोसिस्टमला मोठा धक्का बसेल.

आता आपणच सांगा मागील दोन-तीन वर्षांमध्ये कोणत्या क्षेत्राची उलाढाल कमी झाली आहे? कामगारकपात झाली आहे?

‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’, अशी आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे. असेच काहीसे सध्या झालेय. कोरोनाच्या आधी बदल होऊ घातलेल्या क्षेत्रामुळे व्यावसायिकांची कंबर आधीच मोडली होती. ज्यांचे व्यवसाय अशा बऱ्याच घडामोडींवर आणि इकोसिस्टमवर परावलंबी असतात त्यांना फटका बसला आहे.

मनुष्यबळ आणि मोठ्या प्रमाणात खेळत्या भांडवलाची गरज भासणाऱ्या उद्योगांना मी “स्थुल उद्योग” म्हणेन. कारण वार्षिक १० कोटी उलाढाल असलेले आणि फक्त ५ लाख उलाढाल असलेले एकाच पंक्तीत बसलेले दिसतात.

मग आता करायचे काय?

मुळात यासाठी खुल्या मनाने विचार आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा मोठेपणा घेता आला पाहिजे.

युरोपात सुरू झालेल्या औद्योगीक क्रांतीने बराच काळ गाजवला. त्यावेळी इतर संधीच उपलब्ध नसल्यामुळे पडेल ते काम करायची मानसिकता सगळ्यांची होती. त्यानंतर पुढे माहिती-तंत्रज्ञान म्हणजेच आयटीचे युग आले. त्यामुळे आता बाजारपेठ अमर्याद झाली आणि त्यामुळे प्रचंड स्पर्धा सुरू झाली.

ज्याने पारंपरिक व्यवसायातून स्वतःला या स्पर्धेसाठी बदलून घेतले तोच टिकला. थोडी नजर आजूबाजूला फिरवली तर लक्षात येईल की १०-१५ वर्षांपूर्वी ज्या नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी होत्या त्या आता दिसत नाहीत.

थोडक्यात सांगायचे तर ज्याचे व्हिजन “हे विश्वची माझे मार्केट” असे आहे, त्याला मरण नाही. ज्या ठिकाणी ग्राहक आणि व्यावसायिक हे दोघेही ‘win-win situation’मध्ये असतात त्या व्यवसायाला मरण नाही.

Asset light model

‘Asset light model’ हे पुढचे शतक गाजवणार यात शंका नाही. युट्यूब, स्वीगी, झोमॅटो, ओला, उबर ही यांची ठळक उदाहरणे आहेत. सगळ्यात मोठा फरक म्हणजे जिथे सगळे व्यवसाय आपापल्या इकोसिस्टमच्या साखळीत जखडून असताना या मॉडेलने आपले जाळे विणले.

सध्याचा काळ ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात उत्तम. स्वतःचे प्रोमोशन, मार्केटिंग परिणामकारक पद्धतीने करा. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून नवीन बदल स्वीकारा. व्यवसाय diversified ठेवण्यावर भर द्या. स्थुल व्यवसायापेक्षा ‘चपळता’ लक्षात घ्या. व्यवसायाची साखळी उभारण्यापेक्षा जाळे (Network) उभारा. साखळी तुटू शकते, जाळे नाही.

– प्रतिक कुलकर्णी
संपर्क : 9561809993

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?